पोहायला गेले अन् मृतदेहच बाहेर आले; धरणक्षेत्रात आठ महिन्यांत १० जणांचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:50 IST2023-08-30T13:50:08+5:302023-08-30T13:50:38+5:30
सध्या पावसाळा असल्याने निसर्ग पर्यटन करण्यासाठी लोकं तलाव, ओढे, विहिरी, धरणक्षेत्रात गेल्यावर त्यांची पाण्यात उतरण्याची इच्छा होते

पोहायला गेले अन् मृतदेहच बाहेर आले; धरणक्षेत्रात आठ महिन्यांत १० जणांचा गेला जीव
पुणे : गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात बुडून मृत्युमुखी पडण्याची संख्या गतवर्षीपेक्षा यंदा अधिक आहे. गेल्यावर्षी हवेली तालुक्याच्या हद्दीतील धरणक्षेत्रात ११ जणांचा मृत्यू झाला तर, यंदा आठ महिन्यांतच १० जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणलोट क्षेत्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या पावसाळा असल्याने निसर्ग पर्यटन करण्यासाठी लोकं घराबाहेर पडत आहेत. अनेक तलाव, ओढे, विहिरी, धरणक्षेत्राचे पाणलोट भरून आहेत. त्यात उतरण्याची अनेकांना इच्छा होते. म्हणून ते जातात. परंतु पोहता येत नसले तरी पाण्यात जाण्याचे धाडस करतात. चांगले पोहणारे असले तरी त्यांना जीव गमवावा लागतो. कारण पाणलोट क्षेत्राच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही.
याविषयी हवेली पोलिस सातत्याने जनजागृती करत आहेत. त्यांच्यासोबत वन्यजीव रक्षक संघटनेचे तानाजी भोसले हेदेखील काम करत आहेत. त्यांनी अनेकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. सर्वच ठिकाणी पोलिस तैनात करता येत नाहीत. म्हणून नागरिकांनीच स्वयंशिस्त दाखवून पाण्यात उतरू नये, असे भोसले यांनी सांगितले.
हवेली पोलिस स्टेशन
धरणक्षेत्र परिसरातील मृत्यू
२०२२-११
२०२३-१०
भोर पोलिस स्टेशन
२०२२ - ०७
२०२३ -०४
वेल्हे पोलिस स्टेशन
२०२२ - ०४
२०२३ - ०२
पोलीस तरी कुठेकुठे लक्ष देणार आहेत ?
आम्ही धरण क्षेत्राच्या परिसरात वन्यजीवांसाठी काम करतो ; पण अनेकदा खडकवासला पाणलोट क्षेत्र मोठे आहे. त्यात बहुतांश जण पाण्यात उतरून बुडतात. अशा घटना सातत्याने घडतात. नागरिकांनी याविषयी स्वयंशिस्त ठेवायला हवी. कारण एकदा जीव गेला तर परत येणार नाही. पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने पोलीस तरी कुठेकुठे लक्ष देणार आहेत ? त्यांच्याही काही अडचणी असतात. - तानाजी भोसले, जीवरक्षक