Unseasonal Rain: यवत परिसरात वादळी वारे, पाऊस आणि गारांचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:11 IST2026-03-22T11:10:46+5:302026-03-22T11:11:25+5:30
- रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; महसूल, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू

Unseasonal Rain: यवत परिसरात वादळी वारे, पाऊस आणि गारांचा तडाखा
यवत : बळीराजाला आधीच शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने तो संकटात सापडला आहे. त्यातच गुरुवार आणि शुक्रवार (दि. १८ व १९) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवत, यवत स्टेशन, यादववाडी, घिंगेवाडी, भोसलेवाडी, नाथचीवाडी, खुटबाव आणि आसपासच्या गावांमध्ये सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस जोराने कोसळत होता. काही ठिकाणी गारांचा सडा पडल्याने पिके पूर्णतः नष्ट झाली. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली.
विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरबरा, मका, कांदा, पालेभाज्या, फळबागा भुईसपाट झाल्या. बाजारभाव नसल्याने शेतकरी आधीच संकटात असताना या नैसर्गिक आपत्तीत आणखीनच चिंतेत सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महसूल आणि कृषी विभागाला तत्काळ घटनास्थळी जाऊन नुकसानीचे ‘वस्तुनिष्ठ’ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हा अहवाल प्रशासनाकडे सादर करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्यात येईल. - राहुल कुल, आमदार दौंड
यवत परिसरातील गावे, वाडी, वस्ती या ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल अशी टीम कार्यरत आहे. वादळी वारा, पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन नुकसानाची माहिती द्यावी - नवनाथ दिवेकर, कृषी अधिकारी यवत