पुणे : माझे लग्न ठरविताना मी कारखान्याचा संचालक होतो. डायरेक्टर पद मोठे वाटत होते. कारखान्याचे डायरेक्टर झाल्यामुळे माझे लग्न जुळले असा किस्सा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्ट, मिश्किल आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. अजित पवार यांच्या राजकारणाची सुरुवात ही कारखान्याच्या संचालकपदापासून सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्यासोबत लग्न करण्याआधी घर बांधण्याचा निर्णय घेतला. माझं ठरलं होतं की, घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? वर्ष १९८० मध्ये सिमेंटचे मोठे शॉर्टेज होते. या निंबाळकर साहेबांकडे सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती. त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, साहेब मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढलं आहे. त्यांनी मला १ हजार पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केलं, असा किस्सा अजित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.
पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांचे नाते अतूट आहे. देशाच्या, राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने या कुटुंबाने ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे १९८८ मध्ये बारामतीची सूत्रे सोपविली. त्यानंतर अजित पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. बारामतीकरांनी त्यांना सात वेळा आमदारकी बहाल करीत भरभरून प्रेम केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील बारामतीकरांच्या प्रेमाची जाणीव ठेवत शहर तालुक्याचा कायापालट केला. पहाटे सहापासून बारामतीकरांसाठी अहोरात्र झटणाऱ्या अजित पवार यांनी शेवटचा श्वास देखील बारामतीच्याच भूमीत घेतला.