अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:27 IST2025-06-27T12:26:32+5:302025-06-27T12:27:18+5:30
- पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार

अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण
पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा तब्बल दहा दिवस आधी निकाल जाहीर केले. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधानही व्यक्त केले; पण अकरावी प्रवेश प्रक्रियेत हाेणाऱ्या विलंबाने या आनंदावर विरजण फिरले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत अडकली असून, पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास पुन्हा विलंब हाेत आहे. ही यादी शुक्रवारी जाहीर हाेणार हाेती, पण पुन्हा लांबणीवर पडली आहे.
ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कटऑफ दिसत नसल्याने प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवार (दि. २७) ऐवजी साेमवारी (दि. ३०) जाहीर हाेईल. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिन्याहून अधिक काळ उलटला, तरीही अद्याप अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली नसल्याने प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तारीख पे तारीख थांबणार का ?
अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होते. त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात ३० जून रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे; परंतु, ३० जून ही तारीख तरी पाळली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.
यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकर संपविण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु, दोन्ही वेळेला तांत्रिक अडचणी आल्या आणि ते शक्य झाले नाही. मागील वर्षी २८ जून रोजी पहिली यादी जाहीर झाली होती. त्यामुळे या वर्षी विलंब झाला असे म्हणता येणार नाही. तांत्रिक अडचण दूर करून यादी प्रसिद्ध होण्यास तीन दिवस लागतील. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल.
- दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री