Vande Bharat Express: सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेस; ३ वर्षांत २३ लाख प्रवाशांचा प्रवास, पुणे-मुंबई मार्गावर साडेतेरा लाख प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:46 IST2026-02-13T09:45:26+5:302026-02-13T09:46:30+5:30
वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा आणि वेळेची बचत यामुळे ही सेवा नियमित प्रवाशांसाठी उपयुक्त ठरली आहे

Vande Bharat Express: सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेस; ३ वर्षांत २३ लाख प्रवाशांचा प्रवास, पुणे-मुंबई मार्गावर साडेतेरा लाख प्रवासी
पुणे: सोलापूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने तीन वर्षांत २३ लाख ४३ हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत तिची सरासरी ऑक्युपन्सी १०२.२७ टक्के इतकी नोंदली गेली आहे. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झालेल्या या गाडीमुळे सोलापूर, पुणे आणि मुंबईदरम्यान आर्थिक, सामाजिक व धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.
वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा आणि वेळेची बचत यामुळे ही सेवा नियमित प्रवाशांसाठी उपयुक्त ठरली आहे. ‘पुश-ॲण्ड-पूल’ तंत्रज्ञानामुळे भोर घाटात बँकर लोकोशिवाय गाडी धावते. पुणे-मुंबई-पुणे मार्गावर तीन वर्षांत सुमारे साडेतेरा लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, सकाळच्या अतिरिक्त जलद सेवेचा पुणेकरांना मोठा फायदा झाला आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी जाणारे प्रवासी या गाडीला विशेष पसंती देत आहेत.
वेळेची बचत, २० डब्यांचा रेक
सोलापूर-पुणे-मुंबई असा सुमारे ४५५ किलोमीटरचा प्रवास ही गाडी अवघ्या ६ तास ३० मिनिटांत पूर्ण करते. सुपरफास्ट गाड्यांच्या तुलनेत सुमारे दीड तासांची बचत होत आहे. कुर्डूवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे या गाडीचे प्रमुख थांबे असून, आठवड्यातून सहा दिवस गाडी धावते. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२५ मध्ये १६ डब्यांच्या रेकऐवजी २० डब्यांचा रेक जोडण्यात आला. त्यामुळे आसनक्षमता १,४४० पर्यंत वाढली असून, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
तीन वर्षांची कामगिरी
- एकूण प्रवासी संख्या : २३ लाख ४३ हजार
- सरासरी ऑक्युपन्सी : १०२.२७ टक्के
- प्रवासाचे अंतर : ४५५ किमी
- एकूण वेळ : ६ तास ३० मिनिटे
- आसनक्षमता : १,४४० (२० डबे)
मार्गनिहाय प्रवासीसंख्या
- पुणे ते मुंबई -- ६ लाख ७४ हजार
- मुंबई ते पुणे -- ६ लाख ७३ हजार
- सोलापूर ते पुणे - २ लाख २० हजार
- पुणे ते सोलापूर - १ लाख ७० हजार
‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या गाडीला पुण्यातून कायम गर्दी असते. आगामी काळातही या गाडीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे