कार्यकर्त्यांवरील दगडफेक आणि आंदोलनात पुणे महापौरांचा सहभाग, या दोन्ही गोष्टी दुर्दैवी - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:31 IST2026-02-18T17:30:44+5:302026-02-18T17:31:27+5:30
संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलने शांततेत होणे गरजेचे आहे

कार्यकर्त्यांवरील दगडफेक आणि आंदोलनात पुणे महापौरांचा सहभाग, या दोन्ही गोष्टी दुर्दैवी - सुप्रिया सुळे
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून, काही पत्रकार आणि पोलिसांनाही दगड लागले आहेत. स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना थेट महापौरांवर निशाणा साधला आहे.
सुळे म्हणाल्या, संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, आंदोलने शांततेत होणे गरजेचे आहे. आंदोलनाची झळ इतरांना पोहचता कामा नये. त्यामुळे कॉंग्रेस भवनवर व कार्यकर्त्यांवर झालेली दगडफेकीची घटना आणि या आंदोलनात महापौरांनी सहभाग घेणे, दोन्ही गोष्टी दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे शहराच्या पाण्यावरून आणि पाणी बीलाच्या थकबाकीवरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये सुरू झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून तोडगा काढवा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शासनाच्या दोन विभागामध्ये अशा प्रकारे वाद निर्माण होणे योग्य नाही, त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती मतदार संघात येणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये पाणी, कचरा, वाहतुक कोंडी आणि प्रदुषणाची समस्या सातत्याने वाढत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी दर दोन महिन्यांनी मी महापालिकेकडे पाठपुरावा करते. त्यानुसार आजही महापालिका अधिकाऱ्यांशी हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली आहे.
समाविष्ट गावातील मिळकत कराच्या संदर्भात आम्ही आंदोलन केले, त्यामुळे कराच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. हा प्रश्व राज्य सरकारने सोडवणे गरजेचे आहे. वडगाव येथे विकास दांगट यांच्या प्रयत्नातून एक शाळा आणि नाट्यगृहाचे काम दहा वर्षापूर्वी सुरू झाले. मात्र, हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागला तर त्या प्रकल्पाची किंमत आणि खर्चही वाढतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून हे प्रकल्प पूर्ण करावेत, असेही त्यांनी सांगितले.