महात्मा फुलेंबाबत केलेले वक्तव्य आमच्यासाठी त्रासदायक; 'कोश्यारी यांना पद्मभूषण' या घोषणेवर सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 09:43 IST2026-01-27T09:43:53+5:302026-01-27T09:43:53+5:30
कोश्यारी यांनी ते राज्यपाल असताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे

महात्मा फुलेंबाबत केलेले वक्तव्य आमच्यासाठी त्रासदायक; 'कोश्यारी यांना पद्मभूषण' या घोषणेवर सुळेंची प्रतिक्रिया
पुणे: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून कोश्यारी यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करत असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हटले आहे.
सुळे म्हणाल्या, कोश्यारी यांनी ते राज्यपाल असताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.यावरून सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्याबाबत सुळे यांना विचारले असता त्यांनी दोन्ही चिन्हावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, तर काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर आम्ही लढत आहोत. या निवडणुकीची जबाबदारी आम्ही स्थानिक नेत्यांवर टाकली आहे. आता कराडला सगळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर सगळे आहेत. काही ठिकाणी घड्याळ चिन्हावर लढत आहेत, एक वेगळं मॉडल आम्ही केलं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहावर अवमानकारक टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती.