'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:36 IST2025-06-04T10:35:57+5:302025-06-04T10:36:53+5:30

पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत

Save Purandar stop the airport villagers from affected villages appeal to the President | 'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

'पुरंदर वाचवा, विमानतळ थांबवा', बाधित गावांतील ग्रामस्थांचे राष्ट्रपतींना साकडे

सासवड : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणारा विरोध हा तीव्र स्वरूप धारण करत असताना दिसत आहे. विमानतळ बाधितांनी आता राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांना विमानतळ थांबवा, असे साकडे घातले आहे. विमानतळ बाधित पारगाव मेमाने गावातील बाधित शेतकरी यांनी पुरंदर विमानतळ बाधितांच्या मागण्या मांडणारे पत्र राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांना पाठवले आहे. तसेच, अशाच पद्धतीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांना हे पत्र पाठविले असल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुरंदर विमानतळ विरोधातील शेतकऱ्यांनी म्हटले, महोदया, आपण भारतीय राज्यघटनेच्या रक्षणकर्ता असून, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान आहात, म्हणूनच आम्ही पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत. गेल्या १० वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी आम्हा शेतकऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना इच्छा मृत्यूची परवानगी द्या, अशा तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले होते; परंतु आजपर्यंत त्याला कुठलेही उत्तर मिळाले नाही. आजही आम्ही भारतीय नागरिक असूनही आपल्या देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आमची ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही. आमची ही लढाई आहे, आमच्या भूमी अधिकारांची, लोकशाहीच्या रक्षणाची आणि भारतीय राज्यघटनेतील वचनांच्या सन्मानाची. राज्यघटना वाचवा, लोकशाही वाचवा, पुरंदर वाचवा, अशी मागणी करत आपण एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून या न्याय युद्धात हस्तक्षेप करावा, अशी नम्र विनंती करणारे पत्र हे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित पारगाव गावचे शेतकरी युवराज मेमाणे यांनी सात बाधित गावांच्या तर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे.

Web Title: Save Purandar stop the airport villagers from affected villages appeal to the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.