महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल बडवतात तसे बडवून काढा - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 21:18 IST2018-09-09T21:17:58+5:302018-09-09T21:18:31+5:30
ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले.

महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल बडवतात तसे बडवून काढा - राज ठाकरे
पुणे - ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. तसेच पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात येत्या सोमवारी (दि.10) होणा-या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी हावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित स्वरराज करंडक 2018 स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच स्पर्धेचे संयोजक गणेश भोकरे, मंदार बलकवडे,निलेश हांडे आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवसाम्रांज्य ढोल ताशा पथकाने ,द्वितीय पारितोषिक समाधान ढोल ताशा पथकाने तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुद्रतेज ढोल ताशा पथकाने पटकावले.स्पर्धेत आयुष गाडे व ओंकार वीर यांनी वैयक्तिक पारितोषिक मिळवले.
ढोल ताशा पथकाचे व आमचे एकच काम असते ते म्हणजे बडवणे,असे नमूद करून राज ठाकरे म्हणाले, ढोल ताशाचा गजर आणि आकाशात फडकणारी ध्वज पताका पाहून अंगावर रोमांच उभा राहतो.या ढोल ताशाला महत्त्वप्राप्त करून देण्यात प्रसिध्द संगीतकार अजय अतूल यांचे मोठे श्रेय आहे.त्याचप्रमाणे स्वराज्य अटकेपार घेवून जाणा-या शनिवारवाडा या वास्तूच्या समोर कार्यक्रम होत असल्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केले.तसेच मी स्वत: तब्बल 20 वर्षानंतर शनिवारवाड्यावर बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.