पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:49 IST2025-06-11T13:49:20+5:302025-06-11T13:49:43+5:30

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Rain brings relief, water shortage in Purandar taluka resolved; Water supply by tanker stopped | पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

पावसाचा दिलासा, पुरंदर तालुक्यातील पाणीटंचाई दूर; टँकरने पाणीपुरवठा बंद

- भरत निगडे

नीरा -
 वळीव आणि मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुरंदर तालुक्यातील टंचाई संपली. मे अखेर तालुक्यात २८०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे मे महिना अखेरीस टँकर बंद झाले आहेत. यावर्षी एप्रिल मे महिन्यात तालुक्यात १८ गावे आणि १३ वाड्या तहानलेल्या होत्या. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असतानाच्या उन्हाळ्यातील मे महिन्यात प्रथमच तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

पुरंदर तालुक्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना आणि जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही मे महिन्याच्या मध्यापर्यंत १८ गावे आणि १३ वाड्यांच्या लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच काही भागांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. पण, वळवाचा व नंतर मान्सूनपूर्व पाऊस धुवाधार पडल्याने तालुक्यातील सर्वच टँकर मे महिन्यातच बंद झाले. पुरंदरच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे.

पुरंदर तालुक्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडतो. दक्षिण पूर्व भागातील वाल्हे, राख, नावळी, कर्नलवाडी, गुळूंचे, थोपटेवाडी, पिंपरे या गावातील पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, पूर, पोखर, नारायणपूर, पुरंदर किल्ल्याच्या परिसर व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीही दरवर्षी जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाई वाढते. त्यामुळे दक्षिण पूर्व पट्ट्यासह घाटमाथ्यावर टंचाई निवारणासाठी पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जादा पाऊस पडणाऱ्या भागातही टंचाई जाणवते, त्यामुळे तेथेही पाणीपुरवठा करावा लागतो.

मागील वर्षी (२०२४) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला होता. तरीही एप्रिल महिन्यात पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील राख ग्रामपंचायत हद्दीतील रणनवरेवाडी, चव्हाण वस्ती, पडळकर वस्ती, करे वस्ती, नावळी ग्रामपंचायत हद्दीतील सोनवणे वस्ती, वागदरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बहिर्जीचीवाडी, बाळाजीचीवाडी, वडाचीवाडी, गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी आदी वाड्यावस्त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, आता मागील पंधरा दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे तालुक्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले आहेत.

पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्यावे लागत आहे. तर, काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.

एप्रिलमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षी (सन २०२४) एप्रिल-मेमध्ये पुरंदरच्या २० गावठाणांसह १९३ वाड्यावस्त्यांतील ५७ हजार २९१ लोकसंख्येला ४२ टॅंकरने पाणीपुरवठा केला गेला होता. यावर्षी (सन २०२५) एप्रिल-मेमध्ये १८ गावातील वाड्यावस्त्यातील २४ हजार ९४१ लोकसंख्या आणि ४३ हजार २०० पशुधनासाठी २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मोरगाव योजना नाझरे धरणातून २० टँकर भरले जात होते. दररोज ६५ खेपा होत होत्या.

Web Title: Rain brings relief, water shortage in Purandar taluka resolved; Water supply by tanker stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.