पाऊस कमी होणार, उघडीप मिळाल्यास पेरण्या मार्गी लागणार, राज्यात पुढील पाच दिवसांतील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:47 IST2025-05-30T13:46:06+5:302025-05-30T13:47:34+5:30
सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पाऊस कमी होणार, उघडीप मिळाल्यास पेरण्या मार्गी लागणार, राज्यात पुढील पाच दिवसांतील स्थिती
पुणे : गेल्या आठवडाभर पावसाने राज्याला झोडपून काढल्यानंतर आता पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसांत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
पावसाचा जोर कमी होणारमॉन्सूनने गुरुवारी राज्यात प्रगती केली नसती तरी छत्तीसगड, ओडिशा बंगालचा उपसागर व ईशान्येकडील काही राज्यांत धडक दिली आहे. पुढील दोन दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालमधील उर्वरित भागांमध्ये प्रगती करण्यासाठी वातावरण अनुकूल असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, “मॉन्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरले असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही विरला आहे. तर बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व भागातील विशेष करून ओडिशा, बिहार व पश्चिम बंगालमध्ये सध्या पाऊस होत आहे. या स्थितीमुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. या भागांमध्ये पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी हलका ते मध्यम व त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.
वापसा येण्यास मदत होईल
गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. मे महिन्यात अशा स्वरूपाचा पाऊस यापूर्वी झालेला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल. कोकणातील शेतकऱ्यांना आता भात रोपे टाकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. राज्यात कापूस व सोयाबीन या दोन पिकांखालील क्षेत्र मोठे आहे. अतिवृष्टी झालेल्या विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करावी, असा सल्ला कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिला आहे.
मॉन्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातही पाऊस कमी होईल. - डॉ. एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
पाऊस थांबल्यास वापसा येण्यास मदत होईल. त्यानंतर पेरणीयोग्य स्थिती पाहून बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी