घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू; पाच हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात, शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:46 IST2026-03-12T14:45:42+5:302026-03-12T14:46:06+5:30

- घोड नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

pune news summer cycle begins from Ghod Dam; Five thousand cusecs of water enters the riverbed, relief for farmers | घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू; पाच हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात, शेतकऱ्यांना दिलासा

घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू; पाच हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात, शेतकऱ्यांना दिलासा

रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून सुमारे पाच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे घोड नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

५.४६ टीएमसी क्षमतेच्या घोड धरणात सध्या सुमारे ५५ टक्के म्हणजेच २.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती उपअभियंता महेश शिंदे व कनिष्ठ अभियंता वैभव काळे यांनी दिली. शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा कटके तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले.

या आवर्तनाचा फायदा शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी, तांदळी, इनामगाव, गणेगाव दुमाला तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, वांगदरी, हंगेवाडी, चिंभळे, काष्टी, आदी गावांना होणार आहे. घोड धरणाखाली शिरसगाव काटा, धनगरवाडी, नलगेमळा, गांधलेमळा, खोरेवस्ती आणि संगम असे सहा बंधारे असून, या आवर्तनामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.

गेल्या आठ दिवसांपासून या बंधाऱ्यांमधील पाणी जवळपास आटल्याने घोड नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. शेतकऱ्यांनी काटकसरीने उपलब्ध पाण्यावर ऊस, भुईमूग, डाळिंब, मका, आदी पिके टिकवून ठेवली होती. दरम्यान, अंदाजे २०० एमसेफटी पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून, हे आवर्तन दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे.

शेती व जनावरांसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार माऊली कटके यांच्याकडे केली होती. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच माजी आमदार अशोक पवार यांनीही कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत तत्काळ पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुलीचे काम करत असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभाग, शिरूर कार्यालयात जाऊन पाणीपट्टी भरावी, असे आवाहन उपअभियंता महेश शिंदे यांनी केले.

यावेळी उपअभियंता महेश शिंदे, कनिष्ठ अभियंता वैभव काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, चिंचणीचे माजी उपसरपंच नामदेव पवार, गौरव जांगडे, राहुल कांबळे, तुकाराम कानसकर, इंद्रजित वाळुंज, रोहिदास पवार, संपत जगताप, सागर पवार, संभाजी पवार, रंगनाथ शिंदे, दादासाहेब पवार, आदी उपस्थित होते.

Web Title : घोड बांध से ग्रीष्मकालीन सिंचाई के लिए पानी छोड़ा गया, किसानों को राहत

Web Summary : शिरूर और श्रीगोंडा तालुका के किसानों को लाभान्वित करते हुए घोड बांध से 5,000 क्यूसेक पानी छोड़ा गया। इस पानी की आपूर्ति से पानी की कमी दूर होगी और 4,000 हेक्टेयर भूमि की सिंचाई होगी। किसानों और अधिकारियों के अनुरोध के बाद पानी छोड़ा गया, जिससे फसलों और पशुधन को राहत मिली। किसानों से जल कर भरने का आग्रह किया गया।

Web Title : Ghod Dam Releases Water for Summer Irrigation, Farmers Relieved

Web Summary : Ghod dam releases 5,000 cusecs of water, benefiting farmers in Shirur and Shrigonda talukas. The release addresses water scarcity, irrigating 4,000 hectares. Water was released after requests from farmers and officials, providing relief for crops and livestock. Farmers urged to pay water tax.