प्रवाशांची कुचंबणा; दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर असुविधांचा डबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:44 IST2025-08-23T17:44:14+5:302025-08-23T17:44:46+5:30

- रेल्वे प्रशासनाची अनास्था; सुविधांचा अभाव, प्रवाशांना एकाच डब्यात कोंबून करावा लागतोय प्रवास, गर्दी, चोरी, छेडछाडीच्या प्रकारात झाली वाढ, तातडीने उपाययोजना करण्याची होतेय मागणी

pune news passengers in shock; A lot of inconvenience on Daund-Kedgaon-Pune railway route | प्रवाशांची कुचंबणा; दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर असुविधांचा डबा

प्रवाशांची कुचंबणा; दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर असुविधांचा डबा

- बापू नवले

केडगाव : दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी रोजचा प्रवास हा एक अवर्णनीय संघर्ष बनला आहे. रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, डब्यांमध्ये ढवळाढवळ करणारी अनियंत्रित गर्दी आणि प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळे प्रवाशांची परवड थांबत नाही. सकाळी-संध्याकाळच्या वेळात परिस्थिती इतकी बिकट होते की, महिला प्रवाशांसाठी तर प्रसाधनगृहाचा वापरसुद्धा अशक्यप्राय झाला आहे. 'आमची व्यथा ऐकणारं कोणीतरी आहे का?' असा हवालदिल प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

केडगाव हे पुणे शहरालगतचे एक महत्त्वाचे उपनगर असून, येथून दररोज मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी आणि इतर नागरिक पुण्यात कामासाठी आणि शिक्षणासाठी ये-जा करतात; मात्र रेल्वेच्या अपुऱ्या सेवेमुळे हा दैनंदिन प्रवास एक वेदनादायी अनुभव झाला आहे. प्रवाशांना एकाच डब्यात कोंबून प्रवास करावा लागतो. पाय ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे दरवाज्यात लटकून प्रवास करणे ही इतकी सामान्य घटना झाली आहे की ती आता कोणाच्याच लक्षात येत नाही.

या मर्यादित सेवेमुळे निर्माण झालेल्या गर्दीमुळे चोरी, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांचा धोका वाढला आहे. अनेक प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू प्रवासादरम्यान चोरीला गेल्याचे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्याचबरोबर, गाड्या वेळेवर न आल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या कामावर किंवा शाळांमध्ये उशीर होतो. या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली, तरीही आजवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
 
स्टेशनची नवीन इमारत, जुनी जाचक सेवा

यासंदर्भातील विरोधाभास अधिकच तीव्र करणारी घटना म्हणजे नुकतेच केडगाव रेल्वे स्टेशनचे भव्य नूतनीकरण करण्यात आले आहे. लाखो रुपये खर्चून या स्टेशनला राष्ट्रीय पातळीवरील दर्जा देण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांचे म्हणणे आहे की ज्या प्रवाशांसाठी हे स्टेशन उभारले गेले, त्या प्रवाशांचीच येथे कुचंबणा होत आहे.

स्थानिक प्रवासी सागर नेवसे यांनी लोकमतशी बोलताना एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. "सकाळी ८:५५ वाजता बारामती-पुणे डेमो गेल्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता दौंड-पुणे डेमो गाडी येईपर्यंत, म्हणजे साडेआठ तासांपर्यंत, केडगाव स्टेशनवर पुण्याकडे जाणारी एकही गाडी थांबत नाही. सकाळी नऊनंतर पुण्याला जायचे असलेल्या प्रवाशांसाठी पर्यायच नाही," असे ते म्हणाले.
 
भविष्यातील धोका, तातडीची गरज

केडगाव रेल्वे प्रवासी संघाचे दत्तात्रय टेकवडे यांनी भविष्याचा इशारा दिला आहे. "या समस्येवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे, नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होईल. या वाहतूक समस्येमुळे कंटाळून अनेक जणांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, तर काही जण पुण्यात जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच व्यवसाय करू लागले आहेत. सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० या कालावधीत किमान एक तरी जलद गाडी केडगावला थांबवणे अत्यावश्यक आहे," असे ते सांगतात.

अशाप्रकारे, रेल्वे प्रशासनाकडे केडगावसारख्या वाढत्या उपनगराच्या प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याने, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर वाढत आहे. प्रवाशांची ओरड ऐकून घेणे आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलणे ही आता रेल्वे प्रशासनाची जबाबदारी राहिली आहे. 

Web Title: pune news passengers in shock; A lot of inconvenience on Daund-Kedgaon-Pune railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.