राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत; अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करा – सयाजी शिंदे
By किरण शिंदे | Updated: February 8, 2026 16:03 IST2026-02-08T14:35:02+5:302026-02-08T16:03:26+5:30
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत; अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करा – सयाजी शिंदे
पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी बारामती येथे भेट देत पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत, अशी अजित पवार यांची इच्छा होती, असे सांगत सयाजी शिंदे यांनी ती इच्छा पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. राज्याच्या विकासासाठी एकसंघ नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांना भेटून त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार हे कार्यक्षम, निर्णयक्षम आणि लोकांशी जोडलेले नेते होते, असे सांगत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.