जलसंपदाच्या आडून भाजप सरकारच्या धमक्या; जलसंपदाच्या पाणी बंद करण्याच्या इशाऱ्यावर काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:12 IST2026-02-18T12:06:58+5:302026-02-18T12:12:39+5:30
- राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी वापरासाठी ११.६० टीएमसी कोटा मंजूर केला आहे.

जलसंपदाच्या आडून भाजप सरकारच्या धमक्या; जलसंपदाच्या पाणी बंद करण्याच्या इशाऱ्यावर काँग्रेसची टीका
पुणे : धरणातून मिळणारे पाणी थांबवू, अशा धमक्या भाजप सरकारकडून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पुणेकरांना दिल्या जात आहेत. त्याचा आम्ही विरोध करू, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मोहन जोशी यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पुणे शहराच्या पाणी वापरासाठी ११.६० टीएमसी कोटा मंजूर केला आहे. पुणे महापालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन खडकवासला धरणातून १८ टीएमसी पाणी मिळावे, अशी पुणेकरांची मागणी आहे. त्या मागणीकडे दुर्लक्ष करायचे, तसेच जादा पाणी वापराबद्दल ९३३ कोटी रुपये दंड भरा, अशी नोटीस पाठवायची; दंड न भरल्यास १२ दिवसांत पाणी बंद करू, अशी धमकी द्यायची, हा प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पुण्यात भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रात मंत्री आहेत. राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. भाजपचे १०० हून अधिक नगरसेवक आहेत. पुणेकरांनी एवढे पाठबळ देऊनही भाजपचे नेते पुण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून घेऊ शकलेले नाहीत. निवडणुका लढवायच्या, जिंकायच्या एवढा एककलमी कार्यक्रम भाजपचा चालू आहे. पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदाने नाही, तर जलसंपदाच्या आडून भाजप सरकारने पुणेकरांना दिल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. भाजपच्या निष्क्रियतेचा आणि पुणेकरांचे पाणी बंद करू, अशा धमक्या देण्याच्या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.