Pune villages water shortage: समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:16 IST2026-04-01T16:16:38+5:302026-04-01T16:16:38+5:30
या नव्याने समाविष्ट झालेल्या महापालिकेतील गावातील सर्रास सोसायट्यांमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे

Pune villages water shortage: समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या नऱ्हे, धायरी, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी आदी गावातील सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा अपुरा तसेच कमी दाबाने होत असल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. महापालिकेत समाविष्ट होऊनही परिसरातील पाणीटंचाईवर महापालिकेच्या वतीने अद्यापपर्यंत कोणताच तोडगा काढण्यात न आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
या नव्याने समाविष्ट झालेल्या महापालिकेतील गावातील सर्रास सोसायट्यांमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खडकवासला धरणाजवळ असूनही मुबलक पाणी पोहोचण्यासाठी महापालिकेने अद्यापपर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. नऱ्हे ग्रामपंचायत निधीतून १ कोटी २२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या वीस लक्ष लिटर पाण्याच्या टाकीतून महापालिकेच्या वतीने परिसरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून तेही अर्धा तास किंवा एक तासच पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे सोसायट्यांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. येथील पाणीटंचाईचे प्रमुख कारण म्हणजे सध्या महापालिकेकडून करण्यात येणारी पाणीपुरवठा यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. येथील नागरिक वापराच्या पाण्याकरिता खासगी टँकर मागवत असले तरी यंदा टँकरचालकांनीही प्रतिटँकर आठशे रुपये दराने विक्री सुरू केल्याने नागरिकांच्या खिशाला अधिकची भर पडत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार समाविष्ट गावांची लोकसंख्या हजाराच्या पटीत
* प्रत्यक्षात प्रत्येक समाविष्ट गावांची लोकसंख्या लाखाहून अधिक
* सध्याच्या पाण्याच्या टाक्यांची क्षमता कमी
* बोअरवेल यंत्रणा कुचकामी
* प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाही
* उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे टँकरला प्रचंड मागणी
* पाणी उपलब्ध नसल्याने खासगी टँकरचालक सेवा पुरवण्यास असमर्थ
या परिसरात होतेय पाणीटंचाई....
सध्या नऱ्हे, धायरी, नांदेडगाव, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर, आदी परिसरात पाणीटंचाई तीव्र आहे. महापालिकेत गावे समाविष्ट झाले असली तरी यंदाच्या उन्हाळ्यात तरी आम्हाला पाणी मिळणार का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
समाविष्ट गावांना सोसायटीत वापराच्या पाण्याकरिता खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी दर महिन्याला लाख -दीड लाख रुपये खर्च येतो आहे. गावे महापालिकेत समाविष्ट होऊनही सोसायटीत खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे. -धनंजय बेनकर, शहराध्यक्ष: आम आदमी पार्टी
नऱ्हेगावातील अभिनव कॉलेज परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. महापालिकेत गाव गेल्याने येथील पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा आहे. सध्या परिसरात महापालिकेकडून मोफत पिण्याचे पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत, तसेच लवकरात लवकर २४ x ७ नुसार गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. - रामदास मुळे, नागरिक, नऱ्हे