पुणे : युद्धजन्य परिस्थितीत यंत्रणांची सज्जता तपासणी तसेच नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार घेण्यात येणाऱ्या मॉकड्रिलमध्ये राज्यातील पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीन ठिकाणी बुधवारी (दि. ७) दुपारी चार वाजता मॉकड्रिल करण्यात येणार आहे. या दरम्यान या तिन्ही ठिकाणी सायरन वाजविण्यात येणार आहे व यंत्रणांची सज्जता तपासण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. मात्र, पुण्यात ब्लॅकआऊट अर्थात लाईट बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी (दि. ७) देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिल करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बुधवारी पुण्यात मॉकड्रिल करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉकड्रिल केले जाणार आहे. पुणे शहरात विधान भवन, पौड येथील मुळशी पंचायत समितीचे कार्यालय आणि तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद येथे बुधवारी दुपारी चार वाजता सायरन वाजवून हे मॉकड्रिल करण्यात येणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत मदत आणि मार्गदर्शन पोचविण्यासाठी खबरदारी म्हणून हे मॉकड्रिल आयोजित केले आहे. एखाद्या इमारतीमध्ये आग लागल्यास कशा पद्धतीने कार्यवाही करायची हे तपासले जाणार आहे.
समजा बॉम्ब हल्ला झाल्यास जखमींना कमीतकमी वेळेत रुग्णालयात दाखल करून उपचार कसे देता येतील हे पाहिले जाणार आहे.”या मॉकड्रिलमध्ये जिल्हा प्रशासन, पोलिस, लष्कर, हवाईदल, अग्निशमन दल, एनडीआरएफ, पुणे आणि पिंपरी महापालिका, आरोग्य विभाग सहभागी असणार आहेत. प्रत्येक विभागाचे १० ते १५ अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील. या व्यतिरिक्त सामान्य नागरिक म्हणून विविध महाविद्यालयांचे १०० ते १५० विद्यार्थी उपस्थित राहतील. हेच विद्यार्थी यानंतर मास्टर ट्रेनर म्हणून काम करतील. केंद्र सरकारच्या सूचना आल्यानंतर पुढील टप्प्यात ते काम करती. सरकारच्या निर्देशाप्रमाणे पहिला मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूमसुद्धा तयार करण्यात येणार आहे. त्यात सर्व विभागांचा समन्वय असणार आहे.
केंद्र सरकारने देशातील संवेदनशील असलेल्या २४४ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी अर्थात दुपारी ४ वाजता हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. त्यात राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांत मॉकड्रिल करण्यात येणार आहे. केवळ मुंबईत ब्लॅकआऊट अर्थात-लाईट बंद केली जाणार आहे. पुण्यात मात्र, ब्लॅकआऊट नसेल असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
मॉकड्रिलवेळी बचाव कार्याचा सराव घेतला जाणार आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसारच हे मॉकड्रिल पार पडणार आहे. मॉकड्रिलसाठी तीन तासांचा वेळ दिला असला तरी मदत कार्य हे लवकरात लवकर पूर्ण करून प्रतिसादाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न असे. हे मॉकड्रिल एक ते दीड तासांत पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरांमध्ये सध्या ७६ ठिकाणी सायरन आहेत. हे सायरन १९६५ च्या युद्धामध्ये वापरण्यात आले होते. मात्र, बुधवारी होणाऱ्या मॉकड्रिल वेळी केवळ तीन ठिकाणी म्हणजेच विधान भवन, मुळशी पंचायत समिती व तळेगाव नगरपरिषद येथे सायरन वाजणार आहे. सायरन वाजल्यानंतर सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता आपापले व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.