पाबळ हादरले..! चारित्र्यावर संशय, सतत वाद; विवाहित महिलेने दोन मुलांसह संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:56 IST2026-02-01T18:51:21+5:302026-02-01T18:56:59+5:30
सकाळी अहिला जाधव आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात घरगुती वाद झाला होता.

पाबळ हादरले..! चारित्र्यावर संशय, सतत वाद; विवाहित महिलेने दोन मुलांसह संपवले जीवन
शिक्रापूर - पाबळ (ता. शिरूर) येथील थोर स्थळ वस्ती परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाबळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), मुलगा सार्थक राजू जाधव (वय ५) आणि चार महिन्यांची चिमुकली गौरी राजू जाधव अशी मृत आई व दोन्ही मुलांची नावे आहेत. जाधव कुटुंब मूळचे बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा येथील असून सध्या पाबळ येथे वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अहिला जाधव आणि त्यांचे पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात घरगुती वाद झाला होता. त्यानंतर अहिला या आपल्या दोन मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने दुपारी पतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, थोर स्थळ येथील शेतकरी परमेश्वर पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत चार महिन्यांच्या गौरीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पुढील शोधाशोध करताना त्याच विहिरीत अहिला जाधव व पाच वर्षांचा सार्थक यांचेही मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अहिलांच्या बहिणी जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्राथमिक तपासात पतीकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेत भांडणे होत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.