Pune Crime: अनैतिक संबंध सोडत नाही; महिलेचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:27 IST2026-03-30T12:25:53+5:302026-03-30T12:27:24+5:30
रखवालदार म्हणून काम करणाऱ्यचे अनैतिक संबंध नको होते, पण तरुणी त्याला सोडायला तयार नव्हती

Pune Crime: अनैतिक संबंध सोडत नाही; महिलेचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : मूळ नेपाळचे असलेले दोघे एकमेकांचे नातेवाईक, दोघांचेही लग्न झालेले, दोघांनाही मुलबाळ झालेले असताना त्यांचे अनैतिक संबंध होते. रखवालदार म्हणून काम करणाऱ्याला आता हे अनैतिक संबंध नको होते, पण ती त्याला सोडायला तयार नव्हती. शेवटी त्याने टोकाचा निर्णय घेत तिला भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला. तब्बल १० दिवसांनी खुनाची घटना उघडकीस आली आहे.
मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. आयुषी कॉम्लेक्स, पारे चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय २५, रा. ओम शांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी, मुळ रा. ढकारी, गाड पालिका, जि. अछाम, नेपाळ) याला अटक केली आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळील वाडा हॉटेलच्या मागील बाजूला जंगलामध्ये १८ ते २८ मार्च २०२६ दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तिखात्री, मनीषा दमाई आणि किशन परिहार हे मूळचे नेपाळचे राहणारे असून गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहतात. खून झालेली मनीषा दमाई ही किशन परिहार यांची बहीण आहे. तर तिघेही एकाच समाजातील आहेत. प्रकाश तिखात्री व मनीषा दमाई यांचे विवाह झाले असून त्यांना मुलेही आहेत. त्यांचे अनैतिक संबंध होते. प्रकाश तिखात्री याला आता हे प्रेमसंबंध नको होते. परंतु, मनीषा हिला ते मान्य नव्हते. ती प्रेमसंबंध तोडण्यास नकार देत असल्याच्या रागातून १८ मार्च रोजी प्रकाश तिखात्री हा तिला घेऊन भिल्लारवाडी येथील जंगलात गेला. तेथे त्याने तिचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.
मनीषा दमाई ही काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिचे नातेवाईक तिच्या मिसिंगची तक्रार देण्यास नऱ्हे पोलिस ठाण्यात गेले होते. हा प्रकार आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे पाठवले. मनीषा हिच्या नातेवाइकांकडून आंबेगाव पोलिस माहिती घेत असताना प्रकाश तिखात्री याचे नाव समोर आले. पोलिसांनी प्रकाश तिखात्री याची आपल्या पद्धतीने चौकशी केली. तेव्हा त्याने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक फिरोज मुलाणी यांनी मनीषा हिच्या नातेवाइकासह आरोपीला घेऊन भिल्लारवाडीच्या जंगलात नेले. तेथे प्रकाश तिखात्री याने घटनास्थळ दाखवले. किशन परिहार याने मनीषा हिचा मृतदेह ओळखला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, वाघमारे आणि डोईफोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलिसांनी प्रकाश तिखात्री याला अटक केली असून, एपीआय मुलाणी पुढील तपास करत आहेत.