Pune Crime: आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून?
By नम्रता फडणीस | Updated: February 24, 2026 12:35 IST2026-02-24T12:31:09+5:302026-02-24T12:35:56+5:30
Pune Crime रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल

Pune Crime: आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून?
पुणे : गाडीवरून उतरा असे म्हटल्याचा राग मनात धरून एकाला शिवीगाळ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पेवर ब्लॉक डोक्यात घालत मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (दि.२२) स्वारगेट येथील डायमंड कॅफे समोर घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. ही केवळ एकच घटना नव्हे, तर शहरात दिवसागणिक अशा गुन्हेगारीच्या घटनांनी पुणेकरांची झोप उडवली आहे.
रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल. अशी दहशतच सामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण व्हावी, अशी स्थिती आहे. घराबाहेर पडलेला मुलगा घरी सुखरूप परत येईल ना? या भीतीने अनेक पालकांना ग्रासले आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात ही पराकोटीची हिंसकता येतेच कुठून?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ वादातून गंभीर मारहाण, खून, शिवीगाळ अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पार्किंगच्या वादातून मारहाण, कट मारणे, धक्का लागणे अशा छोट्या गोष्टींमधून थेट हात उचलण्यासह सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन गटांमध्ये संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. रागावर नियंत्रण नसणे, सहनशीलतेचा अभाव आणि सामाजिक ताणतणाव यामुळे समाजातील हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. व्यक्तीच्या वर्तणुकीत निर्माण होणारी हिंसक प्रेरणा, नैराश्य, स्वार्थ आणि चढाओढीचे युग यामुळे अनेकदा अशा क्रूर घटना घडतात. लहान मुलांमधील हिंसक प्रवृत्ती हे देखील चिंतेचे कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हिंसक प्रवृत्तीची प्रमुख कारणे
१) मानसिक आणि भावनिक तणाव : वैयक्तिक नैराश्य, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कलह हिंसेला जन्म देऊ शकतात.
२) चुकीची संगती आणि वातावरण : सामाजिक आणि परिसरातील नकारात्मक वातावरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सहवास.
३) सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव : वाढती चढाओढ, स्वार्थ आणि सहनशीलतेचा अभाव.
४) डिजिटल प्रभाव : हिंसाचार दाखवणारे चित्रपट, वेब सीरिज आणि सोशल मीडियाचा मुलांवर आणि तरुणांवर पडणारा प्रभाव.
घटना १ - १६ फेब्रुवारी
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून डोक्यात लाकडी बांबूने मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे.
घटना २ - १९ डिसेंबर २०२५
जनवाडी परिसरात (दि. १९ डिसेंबर) मध्यरात्री एका तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत २५ वर्षांचा युवक गंभीर जखमी झाला. आरोपी आणि युवक लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपासून दोघांमध्ये बोलणे बंद होते. याच रागातून लहानपणच्या मित्रावरच आरोपीने वार केले.
सध्याच्या धकाधकीच्या काळात कुणालाच वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. कुणाचेच आयुष्य शांततेत चाललेले नाही. सर्वांचीच सहनशक्ती कमी झाली आहे. प्रत्येक गोष्ट किंवा समस्या क्षणात सुटल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत आहे. संयम राहिलेला नाही. एखाद्याच्या मनात आले की, कृती करून टाकायची अशी मानसिकता आहे. स्पर्धेचे युग, वाढत्या ताण-तणावाबरोबरच वाहतूककोंडीची समस्यादेखील हिंसेचे कारण ठरत आहे. मुळातच लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. सोशल मीडियामुळे लोकांचा फोकसही कमी झालेला आहे. समाजात आपण कसे वागले पाहिजे? याचे लोकांनीच आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. सर्वांनी आयुष्यात नियमांचे पालन करायला हवे. तसेच, कायद्याची कडकपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. - डॉ. निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ