ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:39 IST2025-06-24T18:39:08+5:302025-06-24T18:39:41+5:30
विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली.

ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना
पुणे :अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संबंधित ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेने मागितले होते; परंतु विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू मंगळवारी दिली.
पुण्यात ७ वी हेलिकाॅप्टर आणि लघु विमान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी राममोहन नायडू यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. राममोहन नायडू म्हणाले की, विमान अपघाताची कारणे तपासणीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याच्या चर्चा काही माध्यमांतून झाल्या होत्या. मात्र, त्या अफवा असून, प्रत्यक्षात देशातच तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या वेग, उंची, इंजिन बिघाड व इतर माहितीचे रेकाॅर्ड असते.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियांच्या एअर बस या विमानाने उड्डाण घेतल्यावर काही सेंकदातच अपघात घडला होता. त्या घटनेनंतर ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर लगेच तपासणी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. शिवाय ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या केवळ अफवा आहेत.
हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती टाळणार
चारधाम यात्रेदरम्यान गेल्या आठवड्यात हेलिकॉप्टरचा अपघात होऊन सहा पर्यटकांचा मृत्यू झाला होता. चारधाम यात्रेत भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. दरम्यान हवामानात अचानक बदल झाल्यावर हेलिकॉप्टर अपघाताची शक्यता अधिक असते, यासाठी हवामान निरीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून माहिती संकलन केले जाणार आहे. केदारनाथ व बद्रीनाथमध्ये सुरक्षित हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यात सरकार कटिबद्ध आहे. देशात हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, प्रवासात पर्यटकांच्या सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात येत असून, डोंगराळ भागात एअर ट्रॅफिक कंट्रोलचे व्यवस्थापनही करण्यात येणार आहे, असेही नायडू यांनी सांगितले.