आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार
By राजू इनामदार | Updated: June 6, 2025 16:07 IST2025-06-06T16:06:05+5:302025-06-06T16:07:06+5:30
लाडक्या बहिणीच काय पण कोणत्याही समाज घटकावर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही

आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार
पुणे: सध्या प्रत्येक पक्ष आपापली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्यक्ष निवडणूक येईल त्यावेळी आम्ही एकत्र बसू व ठरवू, त्याविषयी आताच काही सांगण्याची घाई नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बीड काय किंवा आणखी कुठला जिल्हा, चुकीचे कोणी वागले तर त्याच्यावर कारवाई केली जाणारच असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेने त्यांच्या कामकाजासाठी तयार केलेल्या एका अप्लिकेशनचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाले. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला. मंत्र्यांना काही सांगायचे असेल तर त्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक असते. त्यांनी तिथे बोलावे, तेच व्यासपीठ योग्य आहे. बाहेर काही बोलले तर त्याच्या विनाकारण बातम्या होतात हे लक्षात घ्यायला हवे. आमच्यात चांगला एकोपा आहे, कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा पवार यांनी केला. महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके व अमोल मिटकरी यांच्यातील संभाषण मुळीच आवडलेले नाही, बोलताना सर्वांनीच तारतम्य ठेवायला हवे, काहीजणांमध्ये विकृती असते, तिकडे लक्ष द्यायचे कारण नाही असे पवार यांनी सांगितले.
बीड मध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्यामुळे तिथे कारवाई केली. असेच सर्व ठिकाणी होईल. चुकीच्या वागण्याचे समर्थन केले जाणार नाही. तेथील सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्यात येत आहे. काहीजणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. काहीजणांना ते नाकारलेही होते, मात्र त्यांनी दुसऱ्या मंत्ऱ्यांकडून घेतला. त्या मंत्ऱ्यांनी त्यांच्या अधिकारात तो दिला. अशा परवान्यांचीही चौकशी केली जाईल असे पवार म्हणाले.
लाडक्या बहिणीच काय पण कोणत्याही समाज घटकावर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे वर्ग करण्यात आले हे खरे आहे, मात्र त्यांना अंदाजपत्रकात वाढही करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम असतो. त्यांनी अन्याय होणार नाही असे सांगितले म्हणजे तेच अंतीम आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन एकाच दिवशी येणार ना, त्यांनाही वाढदिवस साजरा करण्याचा अधिकार आहे असे सांगत पवार यांनी याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही असे हसतहसत सांगितले. राज व उद्धव आपापल्या पक्षांचे प्रमुख आहे, इंजिन व मशाल यांनी ठरवायचे एकत्र यायचे की नाही, त्याबाबत आम्हाला का विचारता? असा प्रतिप्रश्न पवार यांनी पत्रकारांनाच केला.