"रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला.."; देहूत तुकाराम बीज सोहळ्याला शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:41 IST2021-03-30T15:21:37+5:302021-03-30T15:41:05+5:30
दरवर्षी तुकाराम बीजेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत हजेरी लावतात...

"रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला.."; देहूत तुकाराम बीज सोहळ्याला शुकशुकाट
पुणे:
आम्ही जातो आपुल्या गावा ।
आमचा राम राम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥२॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥३॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥
रामकृष्ण मुखी बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥५॥
या अभंगाची याचि देही याचि डोळा प्रचिती दरवर्षी देहू वासियांसह लाखो भाविकांना येत असते..पण यंदा मात्र राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देहूतसंत तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या ५० वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात आला.त्यामुळे बीज सोहळ्याला 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या नामघोषाने दुमदुमणारी आज देहूनगरीत शुकशुकाट पाहायला मिळाला.
ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले होते.
पुणे जिल्ह्यात कोरोना संकटाने पुन्हा एकदा थैमान घालत आहे. त्याच धर्तीवर संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देहूत दिंडी काढण्यात आली.त्यात देहू मधले स्थानिक लोक सहभागी झाले होते.
दरवर्षी यासाठी वारकरी देहुत हजेरी लावत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यांना बंदी करण्यात आली होती. त्यामुळे वारकरी नाराज होते. मात्र ५० लोकांसह दिंडी काढत ती देऊळ वाड्यात नेण्यात आली.
मागील वर्षभर सर्व सण- उत्सव तसेच आषाढीवारी देखील मोजक्या वारकऱ्यांत साजरी केली आहे. तरीही शासनाची भूमिका मदत करण्याची आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत प्रशासन यंत्रणेने देहूत भाविकांना प्रवेशाला नाकारला होता.
दरम्यान, वारकरी संप्रदायावर धार्मिक कार्यक्रमांची बंधने शिथिल करून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, भजन, अखंड हरिनाम सप्ताह ५० ते १०० वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी केली होती.. मात्र ५० वारकऱ्यांची उपस्थितीची अट कायम ठेवण्यात आली.