पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:20 IST2025-06-21T10:18:52+5:302025-06-21T10:20:07+5:30
पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात पालखी आल्यानंतर निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलिसांसोबतची अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे

पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. २०) शहरात दाखल झाला. आज दोन्ही पालख्या शहरात मुक्कामी आहेत. या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी, तसेच भाविकांचा शहरात मुक्काम आहे. यासाठी पुणेपोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी आहे. या मंदिरात काल वारकरी, पोलिसांसोबत अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर कासेकर हे उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. त्यांच्या या वाईट वागणुकीचा सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक, वारकरी तेथे उपस्थित असतात. पोलिसांना याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते. परंतु कासेकर यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसते आहे.
पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन#pune#ashadhiwari#police#maulipic.twitter.com/KCidJRoX5E
— Lokmat (@lokmat) June 21, 2025
आम्ही संबंधितांशी चर्चा करू
पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दखल घेतली आहे. पालखी सोहळा आनंद, उत्साह, शांतता अन् आनंद देणारा सोहळा आहे. अशा घटना अजिबात घडू नये. आम्ही संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करू. असं इथून पुढे होणार नाही याचीही काळजी घेण्यास सांगू असं ते म्हणाले आहेत.