Pune Traffic: पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:26 IST2025-01-14T18:26:04+5:302025-01-14T18:26:24+5:30
पुण्यात वाहतुकीचा वेग मंदावला असून १० किलोमीटर प्रवासासाठी ३३ मिनिटे वेळ लागत आहे, त्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त

Pune Traffic: पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! वाहतूककोंडीत पुणे जगात चौथ्या तर देशात तिसऱ्या क्रमांकावर
पुणे: देशातील वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारीमुळे शहराकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरावरील ताण वाढत असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, पुण्यात १० किलोमीटर प्रवासासाठी ३३ मिनिटे वेळ लागत आहे. तर पुण्यापेक्षा मुंबईतील वाहतुकीचा वेग जास्त आहे, अशी माहिती डच लोकेशन टेक्नॉलॉजीने तज्ज्ञ टॉमटॉमने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात २०२४ मध्ये सर्वांत गर्दीचं शहर कोलकाता पहिले ठरले आहे. त्यानंतर बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक लागतो.
पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. वर्ष २०२३ मध्ये बंगळुरू हे भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर होते; परंतु २०२४ मध्ये कोलकाताने बंगळुरूला मागे टाकले असून, देशातील सर्वांत गर्दीचे शहर म्हणून पुढे आले आहे. गेल्यावर्षी १० किमी अंतर कापण्यासाठी कोलकातामधील चालकांना सरासरी ३४ मिनिटे, ३३ सेकंदांचा कालावधी लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच अंतरासाठी बंगळुरूत सरासरी ३४ मिनिटे आणि १० सेकंदांचा वेळ लागतो नोंदवला आहे.
पुणे तिसऱ्या स्थानी
भारतात कोलकाता, बंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्याचा सरासरी १० किमीसाठी ३३ मिनिटे आहे. तर तिन्ही शहरांचा समावेश जागतिक गर्दीच्या शहरांमध्येही होतो. कोलकाता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बंगळुरू आणि पुणे यांनी २०२४ मध्ये सरासरी १८ किमी प्रतितास वेगाने १० किमी अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंदांचा प्रवास असल्याने अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले.
दिल्लीमध्ये लागतात २३ मिनिटे
हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई या शहरांमध्ये गर्दी वाढत असून, शहरांत १० किमी प्रवासासाठी अनुक्रमे ३२ मिनिटे, ३० मिनिटे आणि २९ मिनिटे लागतात. तर अहमदाबाद आणि एर्नाकुलममध्ये १० किमीसाठी २९ मिनिटे लागतात. तर जयपूरला २८ मिनिटे लागतात. तर राजधानी दिल्लीमध्ये १० किमी प्रवासासाठी २३ मिनिटे लागतात.
देशात तिसऱ्या, जगात चाैथ्या स्थानी
पुण्यातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा परिणाम वाहतूक वेगावर होत आहे. यामध्ये सर्वात मंद वाहतुकीत पुण्याचा क्रमांक देशात तिसरा आणि जगामध्ये सर्वात जास्त गर्दीचे शहर म्हणून चाैथ्या कमांकावर आहे.