Pune: महाराष्ट्राने ‘कामाचा माणूस’ गमावला; २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणारा लाेकनेता हरपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:55 IST2026-02-03T16:54:28+5:302026-02-03T16:55:41+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले आणि महाराष्ट्र हळहळला, अशी भावना पुणेकरांनी बालगंधर्व येथे श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली

Pune: महाराष्ट्राने ‘कामाचा माणूस’ गमावला; २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणारा लाेकनेता हरपला
पुणे : महाराष्ट्रातील पुराेगामी फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार पुढे नेत २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करणारे लाेकनेते, आधारवड अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले आणि महाराष्ट्र हळहळला, अशी भावना मान्यवरांनी वाहिली. या वातावरनाने बालगंधर्व रंगमंचही गहिवरले हाेते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंच येथे मंगळवारी (दि. ३) आयाेजित श्रद्धांजली सभेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ‘लाेकमत’चे संपादक संजय आवटे, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. गजानन एकबोटे, भाऊसाहेब जाधव, डॉ. मनोहर चासकर, राजेश पांडे, विवेक सावंत, प्रमोद रावत, बाबासाहेब शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, नंदकुमार निकम, एमआयटीचे राहुल कराड, विजय कोलते, आमदार चेतन तुपे, अनिल गुंजाळ, माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक धनपाल कांबळे, माजी आमदार विलास लांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आदींनी श्रद्धांजली वाहिली.
ॲड. संदीप कदम म्हणाले की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला २० वर्षांत प्रगतीपथावर नेण्यात अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. कमी आयुष्यात त्यांनी समाजासाठी मोठे काम केले आहे.
संपादक संजय आवटे म्हणाले की, कामाचा माणूस म्हणजे अजित पवार. त्यांनी कर्तृत्वाने शब्दाला किंमत मिळवली. म्हणून आज संपूर्ण देश हळहळ व्यक्त करीत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन म्हणाले की, बदलत्या काळात शिक्षण संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्याकडे आशेने पाहत होतो.
माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, शालेय ते उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी अजित पवार यांनी काम केले. शिष्यवृत्ती, ग्रंथालये सुरू केली. अनेक महाविद्यालयांचा उत्कर्ष अजित पवार यांच्यामुळे झाला.
सतीश मगर म्हणाले की, माझा आणि अजित पवार यांचा १९७८पासून स्नेह. त्याचे पुढे नात्यात रूपांतर झाले. त्यांचा वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा घेतला पाहीजे.