पाण्यात उतरताना तोल गेला; पवना धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:01 IST2026-02-20T19:00:15+5:302026-02-20T19:01:06+5:30
पुण्याच्या काळेवाडी परिसरातून सात तरुण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते

पाण्यात उतरताना तोल गेला; पवना धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पवनानगर : पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील नकाते नगर, रहाटणी फाटा, काळेवाडी परिसरातील सात तरुण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी ऋतिक कैलास साखरे (वय २४) रा. नकाते नगर, रहाटणी, काळेवाडी, पुणे हा पाण्यात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत शोधकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत अवारे, पोलीस हवालदार नवनाथ चपटे, पवन कराड व संजय पंडित यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून संबंधित तरुणास पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने पवनानगर येथील काले कॉलनीतील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. पवना धरण परिसरात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.