काश्मीर ते कन्याकुमारी; मावळातील २ सायकलपटूंचे अवघ्या १६ दिवसांत ४००० किमीचे अंतर पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:36 IST2026-02-07T16:35:39+5:302026-02-07T16:36:30+5:30
काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दक्षिणेकडील उष्ण हवामानापर्यंत उंच-सखल रस्ते, हवामानातील बदल आणि दररोज २५०-३०० किलोमीटरचे अंतर अशी कठोर आव्हाने पेलली

काश्मीर ते कन्याकुमारी; मावळातील २ सायकलपटूंचे अवघ्या १६ दिवसांत ४००० किमीचे अंतर पार
उर्से : मावळ तालुक्यातील सूरज जाट आणि गणेश गायकवाड या दोन तरुण सायकलपटूंनी अवघ्या १६ दिवसांत ४००० किलोमीटरचे अंतर पार करीत काश्मीर ते कन्याकुमारी (के २ के) हा अतिशय आव्हानात्मक आणि प्रेरणादायी प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या त्यांच्या प्रवासाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
ही मोहीम आशिया खंडातील सर्वांत मोठी ‘सायकल राइड’ म्हणून ओळखली जाते. या भव्य उपक्रमाचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. देशाच्या एकात्मतेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन म्हणून ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली.
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय फिट इंडिया मुव्हमेंट आणि डेअर टू गिअर ॲडव्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले. देशभरातून आलेल्या हजारो अर्जामधून कठोर निवड प्रक्रियेनंतर फक्त १५० सायकलस्वारांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातून निवड झालेल्या रायडर्समध्ये मावळ तालुक्यातील गणेश गायकवाड आणि सूरज जाट या दोघांनी सहभाग नोंदविला. रायडर्सनी श्रीनगर ते कन्याकुमारी असा ४००० किलोमीटरचा विक्रमी प्रवास करीत जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा राज्यांमधून मार्गक्रमण केले. काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दक्षिणेकडील उष्ण हवामानापर्यंत उंच-सखल रस्ते, हवामानातील बदल आणि दररोज २५०-३०० किलोमीटरचे अंतर अशी कठोर आव्हाने पेलली. या मोहिमेचा समारोप १७ नोव्हेंबरला कन्याकुमारी येथे झाला.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कामगिरीची अधिकृत नोंद होणे हा आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. यामागे सातत्यपूर्ण परिश्रम, कठोर शिस्त, आत्मविश्वास आणि अपार जिद्द आहे. - सूरज जाट, गणेश गायकवाड