मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना
By नितीन चौधरी | Updated: June 14, 2025 17:55 IST2025-06-14T17:53:47+5:302025-06-14T17:55:26+5:30
हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आल्याने ते येत्या सोमवारपर्यंत दूर करण्यास सांगितले आहे

मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना
पुणे : गेल्या शनिवारी पावसामुळे हिंजवडीत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली होती. याचे कारण हिंजवडी येथील टाटामेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आले. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत हे अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम यावेळेत पूर्ण न झाल्यास टाटाला १० कोटींचा दंड करण्याची सूचना पीएमआरडीएला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळा आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या पावसाबाबत माहिती घेतली. पुण्यात पुढच्या आठवड्यात पालखी येत आहे. त्यामुळे पावसामुळे पाणी साचणाऱ्या भागात दुरुस्ती करण्याबाबत सांगितले आहे. दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पण त्या ठिकाणी काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेली पावसाळी गटारे व झालेला मोठा पाऊस यामुळे पाणी रस्त्यावर आले. मात्र, आज या गटारांची रुंदी व खोलीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालखी घाटातून जाताना अनेक जण डोंगरावर बसतात; पण या डोंगरावरील खडक ठिसूळ असल्याने जागोजागी बॅरिकेट्स लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. घाटातील फ्लेक्स, जाहिरात फलक काढण्यास सांगितले आहे.
वारकऱ्यांच्या दिंडीला पैसे मिळणारच
एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी जाहीर केला होता. याही वर्षी सर्व मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्या दिंड्यांची यादी बनवली आहे. त्यामुळे सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.