राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक
By अतुल चिंचली | Updated: June 9, 2025 13:06 IST2025-06-09T13:05:57+5:302025-06-09T13:06:39+5:30
राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढेल, पण शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे

राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक
पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले आहे. परंतु याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून आघाडीच्या नेत्यांकडून भाष्य केले जात आहे.
खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रासाठी दोघे एकत्र आल्यास उत्तमच राहणार असल्याचे सांगितले आहे. आता याबाबत जयंत पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. राज ठाकरे महाविकस आघाडीत आल्यावर आघाडीची ताकद वाढेल असं त्यांनी सांगितले आहे. तर दोन्ही एन सी पी एकत्रित येणार यावर कुठलीही चर्चा नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
जयंत पाटील म्हणाले, ठाकरे यांना पण एकत्रित आणण्याचे काम माध्यमे करत आहेत. शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे. राज ठाकरे चांगले प्रभावी वक्ते आहेत. असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढत असेल. तर राज ठाकरे यांना घेण्यात काय गैर नाही असं पाटील यावेळी म्हणाले आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडी मनसेशी युती करण्यास सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. परंतु अजूनही मनसेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. राज ठाकरेंनी सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत युतीवर भाष्य न करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीच्या आक्षेपाबाबत बोलताना पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या बाबतीत काही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. याला निवडणूक उत्तर देणे योग्य आहे. भाजपचे नेते काही वक्तव्य केले आहे. त्यांनी वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.