बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:26 IST2023-03-27T12:25:03+5:302023-03-27T12:26:42+5:30

उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून कोसो दूर...

gopichand padalkar mentality among the young generation to go against Pawar family in Baramati | बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर

बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात जाण्याची तरुण पिढीमध्ये मानसिकता- गोपीचंद पडळकर

बारामती (पुणे) :बारामतीमध्ये पवारांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांच्या विरोधात जाण्याची मानसिकता तरुण पिढीमध्ये झाली आहे. या भागातील तरुणांचे संघटन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ५२ शाखा बारामती-इंदापूरमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

बारामती-इंदापूर तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या ५२ शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रविवारी (दि. २६) झाले. या वेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘मिशन बारामती लोकसभा’ यासाठी या शाखा सुरू करण्यात आल्या नाहीत. तर भाजपचे हे रूटीन वर्क आहे. वर्षातले ३६५ दिवस भाजप या पद्धतीने काम करते. गावगाड्यातील विविध प्रश्न या शाखांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व तरुणांची फळी उभी करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे.

मागील अनेक वर्षे राज्यातील प्रमुख नेतृत्व येथील नेत्यांकडे होते. मात्र येथील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. पळशी येथे आम्ही शाखा उद्घाटनासाठी गेलो होते. त्या वेळी तेथील ग्रामस्थांनी पुरंदर उपसाच्या पाण्याबाबत तक्रारी केल्या. ते पाणी वेळेवर मिळत नाही. त्याची दर आकारणी अधिक असल्याने हा दर कमी करावा, अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुरंदर येथील सभेला आले होते. तेव्हा त्यांची या उपसा योजनेचे दर कमी केले. जानाई-शिरसाई पट्ट्यातील गावांमध्येसुद्धा दुष्काळ आहे. एकीकडे देशातील मान्यवर नेत्यांचा तुम्ही बारामतीला आणायचे, स्वत:चे कौैतुक करून घ्यायचे, पाठ थोपटून घ्यायची, असा टोला पडळकर यांनी पवार कुटुंबाला लावला. या भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर येथील गाऱ्हाणी घालण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत, असे पडळकर या वेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून कोसो दूर...

जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिण्यापासून ते उर्दूमध्ये त्यांचे पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचे विचार परिवर्तन झाले आहे. हिंदुत्वापासून ते कोसो दूर गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते. त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली आहे. आता त्यांच्याकडे पर्याय नाही. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिले नाही. त्यामुळे अशा लोकांना बरोबर घेतल्याशिवाय त्यांना त्यांचे राजकारण करता येणार नाही.

Web Title: gopichand padalkar mentality among the young generation to go against Pawar family in Baramati