१२ वीच्या निकालानंतर मुलीचं टोकाचं पाऊल; विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका, निकाल शांतपणे स्वीकारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 10:52 IST2025-05-06T10:51:51+5:302025-05-06T10:52:44+5:30

बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे टक्केवारी न मिळाल्यामुळे नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

Girl's extreme step after 12th results; Students, don't get discouraged, accept the results calmly | १२ वीच्या निकालानंतर मुलीचं टोकाचं पाऊल; विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका, निकाल शांतपणे स्वीकारा

१२ वीच्या निकालानंतर मुलीचं टोकाचं पाऊल; विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका, निकाल शांतपणे स्वीकारा

राहू (दौंड): पिलाणवाडी (ता.दौंड) येथे इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि.०५) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. हर्षदा बबन पवार (वय-१८ ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. बारावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घोषित झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे टक्केवारी न मिळाल्यामुळे नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नसून यवत पोलीस स्टेशन यांच्याकडून यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कदम करीत आहेत.

विद्यार्थ्यांनी जाे काही निकाल लागेल ताे शांतपणे स्वीकारा. चांगले मार्क मिळाले म्हणून अतिउत्साहात काही करू नका. कमी मार्क पडले म्हणून खचून जाऊ नका. आत्महत्या ही कुठल्याही गोष्टीवरचा उपाय नसतो. असं करून तुम्ही स्वतःला आणि कुटुंबाला एका प्रकारचा मानसिक धक्का देऊन जात आहात. बऱ्याचदा निकालापूर्वीची स्थिती खूप वेगळी असते. अनेक आखाडे बांधलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल लागताे तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनाही धक्का बसत असताे. मग ताे सुखद असाे की धक्कादायक. दाेन्ही प्रकारचा ताण जीवघेणा ठरू शकताे. त्यामुळे आपण निकालाला कसे सामाेरे जाताे, यावर पुढील सर्व काही अवलंबून आहे. तेव्हा पालक आणि विद्यार्थी दाेघांनीही एक ठरवलं पाहिजे की, जाे काही निकाल लागेल त्याचा सर्वप्रथम शांतपणे स्वीकार करू. अन्यथा अनुचित प्रकार घडण्याचा धाेका अधिक असताे असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

डिप्रेशनमध्ये जाऊ नका 

संभाव्य धाेका टाळण्यासाठी आपण प्रथम वास्तव स्वीकारावे, त्यानंतर त्यावर विचार करून प्रतिक्रिया द्यावी. कमी मार्क पडले म्हणून, सर्व काही संपलं असं हाेत नाही आणि खूप जास्त मार्क पडले म्हणून सर्व जग खुलं झालं, असंही हाेत नाही. यामुळे एखाद्याला मार्क कमी पडले तरी ताे डिप्रेशनमध्ये जाणार नाही. मग ताे वास्तव नाकारणार नाही. शिवाय आई-वडील, नातेवाईक यांच्याशी वाटाघाटी (बार्गेनिंग) करणार नाही, विद्यार्थी आणि पालकांमध्ये हाेणारे संभाव्य आराेप-प्रत्याराेप टळतील, तणावातून मुक्तता मिळेल आणि विद्यार्थी टाेकाचे पाऊल उचलणार नाही.   

आत्मविश्वास हरवू नका

समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले की, बारावीचा निकाल म्हणजे अंतिम नाही. परिस्थिती खूप बदललेली आहे. यात प्रत्येकाला संधी आहे. त्यामुळे आत्मविश्वास हरवू देऊ नका. विश्वासाने निकालाला सामाेरे जा आणि नवीन वाट शाेधा.

...तर काय कराल?

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही, आयुष्यात आणखी खूप काही करण्यासारखे आहे, हे स्वत:ला सांगा आणि समजून घ्या, फारच डिप्रेशन आलं असेल तर मानसाेपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या. हे केवळ विद्यार्थीच नाही, तर पालकांनीही करायचं आहे, असेही डाॅ. अमर शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Girl's extreme step after 12th results; Students, don't get discouraged, accept the results calmly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.