शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:18 IST2025-06-14T13:16:28+5:302025-06-14T13:18:20+5:30
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
पुणे - पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे मॉडेल स्कूल व मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत असतांना प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी अजित पवार यांनी आम्ही पण शेतकरी, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाण आहे. चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. असं म्हणत कार्यकर्त्यांना समज दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजितदादांनी दिले आश्वासन... #Pune#ajitpawar#ncp#bachhukadupic.twitter.com/nIPFDvjIAj
— Lokmat (@lokmat) June 14, 2025
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या, बच्चू कडू हे उपोषणाला बसलेत, त्यांना रक्ताची उलटी झालीय. तुम्ही न्याय द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी मागणीही यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. यात महिला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. मात्र आज अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यक्रत्यांनी गोंधळ घातल्यानंतर पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, बच्चू कडू यांच्यासोबत बैठक घेऊन विचार करण्यात येणार आहे. बावनकुळे यांनी कालच त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.लवकरच यावर बैठक घेण्यात येणार आहे. आम्ही सुद्धा शेतकरी आम्ही पण शेतकरी, आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांची जाण आहे. चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. तर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रम स्थळावर ठिया मांडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, कडू यांच्या उपोषणाचा शुक्रवारी सहावा दिवस होता. पालकमंत्री तोडगा घेऊन येतील, अशी आशा वर्तविण्यात येत होती. परंतु, त्यांच्या आश्वासनांना दाद न देता बच्चू कडू ठाम राहिले. काँग्रेस व शरद पवार गटाने या उपोषणाला पाठिंबा दिला.
तत्पूर्वी, पालकमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिला होता. यावेळी दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल. कर्जाची वर्गवारी तयार करून अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मंत्री बावनकुळे म्हणाले होते.