अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतच सगळे सारखेच; गिफ्ट रूपात हुंडा पद्धत आजही सुरूच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:39 IST2025-06-03T12:39:03+5:302025-06-03T12:39:51+5:30
आपल्या ऐपती एवढाच खर्च करण्यापेक्षा खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्जे काढूनही मुलीचे लग्नाची तयारी दर्शविणारेही पालक समाजात आहेत

अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतच सगळे सारखेच; गिफ्ट रूपात हुंडा पद्धत आजही सुरूच...
नम्रता फडणीस
पुणे : दोघांचा प्रेमविवाह. साहजिकच देणे-घेणे नसणार हे गृहीतच धरलेले. मात्र, जेव्हा लग्नाची बैठक झाली. तेव्हा वराकडील मंडळींनी आम्हाला तुमच्याकडून काही नकोय. फक्त मुलगी आणि नारळच घेऊ; पण तुमची एकुलती एक मुलगी. तिचं लग्न तुम्ही धूमधडाक्यातच लावणार. आमचा मुलगा म्हणत होता तिला मोठ्या प्रशस्त घरात राहायला आवडतं. आमचा काय वन बीएचके फ्लॅट. दोघांच्या सुखी संसारासाठी मुलीला टू बीचके फ्लॅट घेऊन द्यालच. शेवटी मुलगी सुखात राहायला हवी. हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी आजही मुलीच्या नावाने तिला आनंदी ठेवण्यासाठी सासरकडच्यांकडून गिफ्टच्या रूपात हुंडा घेण्याची पद्धत समाजात सुरूच आहे.
आज एकविसावं शतक उजाडलं. चंद्रावर जमीन खरेदीदेखील झाली. एआयच्या जगात माणसाने प्रवेशही केला. मुलींना उच्चशिक्षणाची कवाडे खुली झाली. मात्र, अजूनही मुलींचे शिक्षण, स्वभाव न पाहता तिच्याकडे एक वस्तू म्हणूनच पाहिले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. आजही समाज हुंड्यासारख्या जुन्या रूढी परंपरांमध्येच अडकला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे हुंडा घेणाऱ्यांपेक्षा तो देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लाखो रुपये खर्च करून लग्न करून देणं, नवरा- नवरीला दागिने करणं, लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं यासह भांडीकुंडी, फ्रीज, टीव्ही, सोफा यासह संपूर्ण संसार उभा करून देण्याकडे मुलीच्या वडिलांचा कल आहे. चूक खरं तर त्यांचीही म्हणता येणार नाही. आपल्या मुलीला सासरी कोणताही त्रास होता कामा नये, हीच त्यामागची भावना आहे; पण इथंच अप्रत्यक्षपणे हुंडा देत आहेत, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. एकदा मुलीला विविध वस्तू द्यायला सुरुवात केली की, सासरकडच्या मंडळीचा हा समज होतो की मुलीकडच्या लोकांकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे इतकं दिलंच आहे तर मग एक मुलीला फिरायला एक गाडीदेखील द्या. शेवटी तुमचं जे काही आहे ते तुमच्या मुलीचेच आहे. मग होऊ द्या की खर्च.
अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतच सगळे सारखेच !
मुलगी शिक्षिका असो की वकील किंवा डॉक्टर. लग्नाचा खर्च मुलीकडच्यांनीच करायचा, ही एक समाजधारणा बनली आहे. त्यामुळे मुलाकडचे यादी देतच राहतात आणि मुलीकडचे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घर, जमीनही विकतात, ही वस्तुस्थिती आहे. ही कथा अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत चालत आली आहे. काही ठिकाणी वर आणि वधू पक्षाचे निम्मा-निम्मा खर्च करण्यास तयारही होतात. मात्र, हे प्रमाण खूप कमी आहे. ज्या कुटुंबामध्ये फक्त एकच मुलगी किंवा मुली आहेत तिथे तर सगळं आमचं शेवटी ते जावयालाच मिळणार आहे, असा एक समजही बनलेला आहे.
मुलींचे माता-पिताही जबाबदार
ठरवून केलेली लग्नं ही बऱ्याचदा स्टेटस पाहून केली जातात. वधू -वराकडील मंडळी बैठकीत देवाणघेवाणीच्या गोष्टी ठरवतात. त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर मग मुलांना लग्नाच्या बोहल्यावर चढविले जाते. मुलीकडचेही त्याला तयार असतात. आपल्या ऐपती एवढाच खर्च करण्यापेक्षा खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्जे काढूनही मुलीचे लग्न करण्याची तयारी दर्शविणारेही पालक समाजात असल्याचे विवाह समुपदेशक लीना भंडारी म्हणाल्या. मुलींना कसे तरी उजवणे हीच पालकांची भावना असते. मुलगी पंचविशीला आली तरी अजूनही घरात कशी? असे समाजातून किंवा नातेवाइकांमधून प्रश्न विचारायला सुरुवात होते. तेव्हा मुलीकडची मंडळी मुलाकडच्या लोकांच्या सर्व मागण्या पुरवायला तयार होतात. भलेही त्यांची ऐपत असो अथवा नसो. त्यामुळे हुंडा पद्धत सुरू ठेवण्यास मुलींचे माता-पिताही जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या.