निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले; काम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते, सपकाळांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:01 IST2025-12-03T10:01:10+5:302025-12-03T10:01:10+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला गोंधळ पाहता निवडणूक आयोग नशापाणी करून काम करत आहे की काय? असा प्रश्न पडत आहे

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले; काम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते, सपकाळांचा आरोप
पुणे: राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या मतदानाला ४० तास शिल्लक असताना मतदान आणि मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंधळ, मतांची धांदल दिसून येत असून, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले बनले आहे. निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सपकाळ एका कार्यक्रमासाठी मंगळवारी पुण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेला गोंधळ पाहता निवडणूक आयोग नशापाणी करून काम करत आहे की काय? असा प्रश्न पडत आहे. राज्यात सत्ताधारी म्हणून काम करताना भाजप पैसा खाऊन गब्बर झाली आहे. सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत राज्याच्या विविध भागातून २५ हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या असाव्यात. लोकशाही ज्या दिशेने चालली आहे, ते घातक असून, आता विजयी झालेले उमेदवार फोडले जातील, अशी भीतीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली. काँग्रेस राज्यभरात १६० ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे.
काँग्रेसमुक्त करायचे होते, आता काँग्रेसयुक्त भाजप
भाजपने काँग्रेस पक्ष संपविण्यासाठी ‘काँग्रेसमुक्त’ भारत अशी घोषणा केली होती. पण, आता भाजपची स्थिती पाहता काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे, असे दिसते. काँग्रेस हा विचार आहे. कोणाच्याही जाण्याने तो संपणार नाही, असेही सकपाळ यांनी सांगितले. सत्तेची मस्ती काय असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार संतोष बांगर होय. जेवढे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, तेवढी पदके मिळाल्याच्या तोऱ्यात ते वागतात, असेही सपकाळ म्हणाले.