मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का? निधी देत नाही म्हणणाऱ्यांना अजितदादांचे प्रत्युत्तर
By अतुल चिंचली | Updated: June 10, 2025 18:06 IST2025-06-10T18:06:10+5:302025-06-10T18:06:42+5:30
एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात, निधी काही एकदम दिला जात नाही

मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का? निधी देत नाही म्हणणाऱ्यांना अजितदादांचे प्रत्युत्तर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त अजित पवार यांच्या पक्षातर्फे पुण्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाषण अजितदादांनी शिंदे गटाचं नाव न घेता त्यांच्या मंत्र्यांचा समाचार घेतला. यावरून त्यांनी स्पष्टीकरण देत मी काय खिशात पैसे घेऊन बसतो का? असा सवाल उपस्थित केला. काही जण म्हणतात की, अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले. यंदाचे बजेट ७ लाख २० कोटींचे मांडण्यात आले आहे. त्यामध्ये ४१ टक्के निधी हा अनुसूचित विभागाला देण्यात आला आहे. गेल्या वर्षी दिलेल्या निधीपेक्षा ३८ टक्के निधी जास्त दिला आहे. पण कुणीतरी म्हणतंय की, अजितदादांनी निधी दिला नाही. ते जाणिवपूर्वक बदनामी करत आहेत. लोकसभेला मागच्या वर्षी केवळ ४ जागा मिळाल्या. लोकसभेला आपला पराभव झाला त्यावेळी लोकांची नाराजी दूर करणं हे काम होतं. त्यावेळी लाडक्या बहिणीचा विचार समोर आला. त्यावेळी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला.
मला काहीजण विचारतात की, तुम्ही भाजपासोबत का गेले? राज्याचा विकास, राज्यातील शेवटच्या माणसाचा विकास हाच मुख्य हेतू होता. पण मित्रानो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०१९ साली शिवसेनेसोबत गेला होता. आपण शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. त्यावेळी आपण काही तडजोडी केल्या होत्या. फक्त विरोधीपक्षात बसून, मोर्चे काढून, आंदोलन करून चालत नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. असे अजित पवार यांनी सांगितले आहे. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल. तेव्हा पाया कमकुवत होईल .ही लढाई विचारांची असून ती विचारांनीच लढली जाईल अशी त्यांनी यावेळी सांगितले आहे.