सलग चौथ्या दिवशी यवतमध्ये जमावबंदी व कडकडीत बंद; गावात शांतता परंतु सतर्कतेचा माहोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:55 IST2025-08-04T17:55:28+5:302025-08-04T17:55:45+5:30
पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

सलग चौथ्या दिवशी यवतमध्ये जमावबंदी व कडकडीत बंद; गावात शांतता परंतु सतर्कतेचा माहोल
यवत : यवत येथे शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) रोजी उसळलेल्या दंगलीनंतर गावात कडकडीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सलग चौथ्या दिवशी आज (दि. ४ ऑगस्ट) गावातील बाजारपेठ पूर्णतः बंद राहिली असून संपूर्ण परिसरात शांतता असली तरी पोलिसांकडून अत्यंत सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
पोलिसांनी त्वरीत कारवाई करत गावात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(१) नुसार जमावबंदी लागू केली असून कोणालाही अनावश्यक गर्दी करण्यास, गटागटाने फिरण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी जमाव करणे यास बंदी घालण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस दलाची तैनाती करण्यात आली असून गावाच्या प्रमुख चौकांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस तपासात आतापर्यंत ९२ संशयित आरोपींची नावे FIR मध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच ५०० ते ६०० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये गंभीर व कठोर कलमे लावण्यात आली असून त्यामुळे आरोपींच्या गटांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सध्या गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व स्तरांवर सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावात शांतता राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.