चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:10 IST2026-02-11T12:04:39+5:302026-02-11T12:10:44+5:30
अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ राबवा, असे सरनाईक यांनी सांगितले

चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण अन् प्रबोधन ही अपघातमुक्तीची गुरुकिल्ली - प्रताप सरनाईक
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ राबवा, असे सांगण्यात आले.
दि. ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.”
वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग
राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः फॉर्म १३८/ए अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष
महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलिस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे, या उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले.