महाराष्ट्रात पावसाची शक्यता; गुढी पाडव्याला वरूणराजाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
By श्रीकिशन काळे | Updated: March 16, 2026 16:51 IST2026-03-16T16:50:54+5:302026-03-16T16:51:20+5:30
२० मार्चपर्यंत राज्यामध्ये कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाची शक्यता; गुढी पाडव्याला वरूणराजाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
पुणे: सध्या राज्यामध्ये उन्हाचा कडाका जाणवत असताना तापमानात घट होऊन पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आजपासून (दि.१६) २० मार्चपर्यंत राज्यामध्ये कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.
येत्या दोन दिवसांवर गुढी पाडवाला आला आहे. गुढी पाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धारशिव, लातूर, सह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज आहे. त्यामध्ये बुधवारी (दि.१८) रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर या १३ जिल्ह्यांमध्ये काहीशी उष्णता जाणवेल. तसेच रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी दिला आहे.