चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 17:21 IST2025-08-10T17:21:20+5:302025-08-10T17:21:29+5:30
चाकण शहराला पाणीपुरवठा जुन्या योजनेवरून केला जात असून दररोज सात ते साठ लाख लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो

चाकण शहराचा ५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिक टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून
चाकण: विजेच्या अतिरिक्त दाबाने शहराला पुरवठा करणाऱ्या पाणी उपसा पंपाचे नुकसान झाल्याने चाकण शहराचा मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. लोकांना पिण्यासह वापराचे पाणी नसल्याने टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
चाकण शहराला पाणीपुरवठा जुन्या योजनेवरून केला जातो आहे. दररोज सात ते साठ लाख लिटर पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. परंतु हा पाणीपुरवठा खूप अपुरा आहे. अगदी दोन-तीन लाखांवर शहराची लोकवस्ती वाढलेली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येला पालिकेलासुद्धा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे जिकरीचे ठरत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाइपलाइनचे फुटतुट झाल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे.
मागील पाच दिवसांपूर्वी विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने पाणीपुरवठा पंप जळाला. स्पेअरला ठेवलेल्या पाणी पंपाचेही नुकसान झाल्याने शहराचा पाणीपुरवठा कोलमडून पडला. याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे. नगरपरिषदकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने ऐन पावसाळ्यात लोकांना वापराचे आणि पिण्याचे पाण्यासाठी टँकर आणि बाटली बंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
सध्या एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा केला जातो आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर किंवा पाइपलाइनचे नुकसान झाल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. शहराची लोकसंख्या वाढल्याने याचा परिणाम जुन्या पाणीपुरवठा योजनेवर होतो आहे. भामा आसखेडवरील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी