'मोठा अधिकारी होऊन गावी लाल दिव्याच्या गाडीतून येईन', असं म्हणणाऱ्या चैतन्यचे स्वप्न राहिले अधुरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:58 IST2026-03-26T09:57:28+5:302026-03-26T09:58:25+5:30
विजेचा शॉक लागून ताे थेट काेमात गेला, गेले दहा दिवस मृत्यूशी झुंजणाऱ्या चैतन्यची धडपड अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्याेत मालवली

'मोठा अधिकारी होऊन गावी लाल दिव्याच्या गाडीतून येईन', असं म्हणणाऱ्या चैतन्यचे स्वप्न राहिले अधुरे
पुणे : शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील भाेजनालयात तांत्रिक बिघाडामुळे मुलांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध हाेत नव्हते, तेव्हा तेथे व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ काम करणारा चैतन्य चव्हाण वाॅटर कुलरची पीन व्यवस्थित करण्यासाठी पुढे आला आणि विजेचा शाॅक लागला. इथेच त्याचा घात झाला आणि विजेचा धक्का लागून ताे थेट काेमात गेला. गेले दहा दिवस मृत्यूशी झुंजणाऱ्या चैतन्यची धडपड अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्याेत मालवली. या घटनेने संपूर्ण महाविद्यालय हादरून गेले आहे. चैतन्यच्या अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांना अश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी त्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला.
पार्थिवावर बुधवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार
विजेचा शाॅक लागल्याने गंभीर जखमी झालेल्या चैतन्य चव्हाण (वय २३, रा. डोंगरगण, ता. आष्टी) याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. मृतदेह बुधवारी सकाळी साडेसात वाजता डोंगरगण येथे आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
...स्वप्न अधुरे राहिले याचे दु:ख
चैतन्य हा अभ्यासात हुशार होता. त्याच्या अंगी जिद्द आणि चिकाटी होती. मी मोठा अधिकारी होऊन गावी लाल दिव्याच्या गाडीतून येईन, असे तो नेहमी बोलायचा. नियतीने त्याला हिरावले आणि मोठा अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. याचे दु:ख आमच्या मनात कायम राहील, अशी भावना चैतन्यचे चुलते रामेश्वर चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
वडील शेती करून मुलांच्या शिक्षणाचा भागवतात खर्च
चैतन्यचे वडील कुंडलिक साहेबराव चव्हाण यांना तीन मुलगे व दोन मुली आहेत. कुटुंबातील मोठा नागेश हा एमपीएसीची तयारी करतो, तर धाकटा तुकाराम हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. मयत चैतन्य हा पुणे येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ही तीनही मुले पुणे इथे शिक्षण घेत आहेत. आई - वडील आणि दोन बहिणी गावी असलेल्या पाच एकर शेतीत काम करतात. यापैकी काही शेती बागायती, तर काही जिरायती आहे. शेती करूनच कुंडलिक चव्हाण मुलांच्या शिक्षणाचा आणि घरचा खर्च भागवतात.