काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:05 IST2024-12-27T13:05:45+5:302024-12-27T13:05:57+5:30
सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशाला झळ बसत असली तरी थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत

काजू १२०० तर बदाम ८०० रुपये किलो; राज्यात थंडीचा कडाका अन् सुकामेव्याच्या दरांचा तडाखा
अजित घस्ते
पुणे: राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. यंदा जगभरात बहुतांशी सुकामेव्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुकामेव्याच्या दरात वाढ १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या सुकामेव्याचा बाजार तेजीत आहे.
मागील दोन वर्षे सातत्याने सुकामाव्याचे दर कमी होते; परंतु यंदा ग्राहकांना काही प्रमाणात सुकामेवा महाग खरेदी करावा लागत आहे. सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे; परंतु यंदा थंडी जास्त असल्याने नागरिक सुकामेवा खरेदीवर भर देत आहेत.
बाजारात बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता, काजू, डिंक, खोबरे, जर्दाळूच्या मागणीत वाढ झाली आहे. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात. त्यामुळे थंडीच्या काळात सुकामेव्याला मागणी वाढते, असे मार्केटयार्डातील ड्रायफुट्स व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.
थंडीत सुकामेव्याला मागणी
दिवाळीत थंडीची चाहूल लागताच सुकामेव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. हिवाळ्यात सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. यामुळे शरीराची कॅलरीची गरज पूर्ण होते. यातून मिळणारे पोषक तत्त्व शरीराला उपयोगी पडतात.
या देशांतून आयात
- खारा पिस्ता - इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया
- बदाम - कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया
- पिस्ता - इराण, इराक
- मॉमेरोन बदाम - इराण
- अक्रोड - अमेरिका, चिली, भारताच्या काही भागांतून
- अंजीर - इराण, अफगाणिस्तान
- बेदाणा - अफगाणिस्तान, भारत
देशांतर्गत आवक
खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक
काजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळ
मनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर
महाग होण्याची कारणे
- वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट
- आयात होत असलेला सुकामेवा महागच येत आहे.
- भारतात सुकामेव्याची वाढती मागणी
- अतिउष्णता आणि अनियमित पर्जन्यमानामुळे काजूचे जागतिक उत्पादन घटले
- झाडांवरून माल कमी निघाल्याने कच्चा काजूचा तुटवडा
यंदा जगभरात सततच्या वातावरणाच्या परिणामामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्चमध्ये नवीन पीक आल्यानंतर दरात घट होईल. इराण युद्धामुळे खजूर, काळा मनुका, अंजीर, केसर, शहाजिरा दरात वाढ झाली आहे. दरात अंदाजे १५-२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. - शुभम गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड
सुकामेव्याचे प्रतिकिलोचे भाव
वस्तूचे नाव नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४
काजू ५५० ते ८५० ८०० ते १२००
अक्रोड बी ८०० ते १२०० १००० ते १५००
अक्रोड (अख्खा) ४५० ते ६०० ६०० ते ८००
बदाम ५०० ते ८०० ५०० ते ८००
अंजीर ७०० ते १००० १००० ते १५००
काळे मनुके ३०० ते ४०० ५०० ते ६००
बेदाणा (भारतीय) २०० ते ३०० २०० ते ३००
खारा पिस्ता ७०० ते १००० १००० ते १५००
जर्दाळू २०० ते ४०० ३०० ते ५००