अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:11 IST2025-07-10T11:10:15+5:302025-07-10T11:11:04+5:30
भाजपने आतापर्यंत लोकसभा, विधानसभेमध्ये चांगले यश मिळविले असून आता ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्याचे नवे मिशन सुरु केले आहे

अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
दुर्गेश मोरे
पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्याला भगदाड पाडण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे त्यानंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुरंदरचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे देखील भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शिवाय महाविकास आघाडीतील नाराज मंडळींना पक्षात घेण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.
पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सर्वाधिक पाच आमदार आहेत. तर त्या पाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) दोन, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) एक तर भाजपचा एक आमदार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. इतकच नाही तर त्यांना जे सोडून गेले आहेत त्यांच्याही अडचणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली असून हा सर्व भार भाजपचे एकमेव आमदार राहुल कुल यांच्यावर देण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खासकरून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या काळात जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता तशी परिस्थिती बदलली आहे. निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र यावर अद्याप कोणत्याही वरिष्ठ नेत्याने भाष्य केले नसले तरी या निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार हे मात्र नक्की.
नाराजांना भाजपची ताकद
भाजपने आतापर्यंत लोकसभा, विधानसभेमध्ये चांगले यश मिळविले आहे. आता ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्याचे नवे मिशन अंमलात आणले आहे. मध्यंतरीच्या राजकीय उलथापालथीनंतर दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांना भाजपची ताकद देण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली असल्याचे समजते. त्यांनीही नाराजांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे.
काँग्रेसचे दोन्ही आमदार भाजपवासी
जिल्ह्यात काँग्रेसचे दोन चेहरे होते एक म्हणजे भाेरचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि दुसरे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप. काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ, पक्षाकडून दुर्लक्ष आणि विकासकामांसाठी मिळणारा पाठिंबा न मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. थोपटे कुटुंबाचा भोर मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. त्यापाठोपाठ आता संजय जगताप हे देखील भाजपच्या गोटात दाखल होणार असल्याच्या चर्चेला पुन्हा जोर धरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून ही चर्चा सुरू होती. परंतु, जगताप यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात संजय जगताप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पण होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या काही निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. १६ जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणींत वाढ
विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी लगेच शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. कारण पवार कुटुंबियांना टक्कर देणारा नेता म्हणून हर्षवर्धन पाटील यांना भाजपने मोठी ताकद दिली होती. मात्र, एका निर्णयामुळे परिस्थिती बदलली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली लढत दिली. हे लक्षात घेत त्यांना भाजप प्रवेशाची संधी दिली. ती त्यांनी मान्यही केली. याचा परिणाम म्हणजे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणींत वाढ झाली. भविष्यामध्ये इंदापूरबरोबरच बारामतीमध्येही भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच मोट बांधली जाणार आहे. सध्या कार्यकर्ते आहेत. पण आता पॉवर बुस्ट मिळणार आहे.
राहुल कुल यांची भूमिका महत्त्वाची
दौंडचे आमदार राहुल कुल यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी जवळचे संबंध आहे. त्याचा भाजपने आतापर्यंत अनेकवेळा फायदा करून घेतला आहे. विधानसभेनंतर भाजपचे लक्ष्य जिल्हा परिषद असून ग्रामीण भागात भाजप पोहोचवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्यावर दिल्याचे समजते. आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना टक्कर देणारा नेता भाजपकडे केवळ राहुल कुल आहेत. तशी कामगिरीही ते करत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तिघांच्या पक्षप्रवेशामागे राहुल कुल यांची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा आहे.