Bhigwan Kidnap case: 'त्या' तरुणीने भावाच्याच मोबाईलवरून केला प्रियकराला कॉल, भिगवणमधील प्रकरणाची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:57 IST2026-02-20T11:53:53+5:302026-02-20T11:57:03+5:30
Bhigwan Kidnap Latest Update: भिगवण प्रकरातील २१ वर्षीय तरुणीने पोलिसांना शपथपत्र दिले आहे. त्यामुळे दोन तरुणांनी अपहरण केल्याचे प्रकरण हा बनाव असल्याचे उघड झाले.

Bhigwan Kidnap case: 'त्या' तरुणीने भावाच्याच मोबाईलवरून केला प्रियकराला कॉल, भिगवणमधील प्रकरणाची Inside Story
Bhigwan Kidnap News in Marathi: लग्नाच्या खरेदीसाठी गेल्यानंतर आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तरुणीला पळवल्याचे प्रकरण एक बनाव असल्याचे समोर आले. इंदापूर तालुक्यातील भिगवणमधील या घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे. तरुणासोबत पळून गेलेली तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. त्या तरुणीने शपथपत्र पोलिसांना दिले असून, अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१७ फेब्रुवारी रोजी तरुणी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी तिने शपथपत्र तयार केले. त्या शपथपत्रात घरचे मर्जीविरोधात माझे दुसऱ्या तरुणासोबत लग्न करून देणार होते. माझे आणि जहीर हारुन शेख याच्यासोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध आहेत, असे तिने लेखी जबाबात म्हटले आहे.
घरच्यांचा प्रेमविवाहाला विरोध
भिगवण येथील या तरुणीने शपथपत्रात म्हटले आहे की माझ्या कुटुंबीयांचा जहीरसोबतच्या प्रेमविवाहाला विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी माझे जवळच्या नात्यातील मुलासोबत लग्न ठरवले होते. २२ फेब्रुवारी रोजी त्याच्यासोबत लग्न ठरले होते. पण, मी माझ्या आईला, दोन्ही भावांना मला हे लग्न करायचे नाही, असे सांगत होते.
त्या तरुणासोबतचे लग्न मला मान्य नव्हते. त्यामुळे मी १७ फेब्रुवारी रोजी माझ्या भावाच्या मोबाईल नंबरवरून जहीरला कॉल केला आणि मला भिगवणमधील बाजारपेठत आई आणि भाऊ वस्तू खरेदीसाठी घेऊन जाणार आहेत, अशी माहिती दिली.
'रेस्ट हाऊसजवळ भेट, मी तुझ्यासोबतच निघून येईल'
तरुणीने पोलिसांना सांगितले की, 'मी जहीर कॉल करून सांगितलं की, तू भिगवणमधील रेस्ट हाऊस जवळच्या आनंद हॉटेलच्या पाठीमागे येऊन थांब. मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्यासोबत निघून येणार आहे. दुपारी २ वाजता तिथे जहीर टेम्पो घेऊन उभा होता.'
'मी आई आणि भावाची नजर चुकवून त्याच्या टेम्पोमध्ये जाऊन बसले. त्यानंतर मी जहीरच्या मोबाईलवरून भावाला कॉल केला आणि सांगितले की, मी जहीरसोबत जात आहे. माझे त्याच्यासोबत १ वर्षापासून प्रेमसंबंध आहे. त्याची कल्पना मी तुम्हाला आधीच दिलेली आहे, असे म्हणाले', तरुणीने पोलिसांना सांगितले.
अपहरण झाल्याचे दुसऱ्या दिवशी कळले
तरुणीने म्हटले आहे की, दुसऱ्या दिवशी सकाळी दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघाल्यानंतर मला माझ्या अपहरण झाल्याच्या बातम्या कळल्या. 'जहीर आणि जहीरचा भाऊ आयान यांनी माझ्या आणि मुलाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून, लाकडी दांडके उगारून मुलीचे अपहरण केले. आणि नथ आणि चांदीची अंगठी हिसकावून नेली, अशी तक्रार माझ्या आईने केली. ही तक्रार खोटी आहे", असेही तरुणीने म्हटले आहे.