राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका
By विश्वास मोरे | Updated: March 5, 2025 19:05 IST2025-03-05T19:03:47+5:302025-03-05T19:05:13+5:30
लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ राजीनामा दिला होता. हा भाजपचा इतिहास आहे.

राज्य अराजकतेकडे जात असल्याची परिस्थिती; मनसे नेते बाळा नांदगावकरांची टीका
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे हे भाजपच्या सरकारमध्ये उपइंजिन म्हणून काम करीत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांच्यावर आरोप झाले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ राजीनामा दिला होता. हा भाजपचा इतिहास आहे. हे राज्य अराजकतेकडे जात नाही ना, असे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आठवते. तशीच परिस्थिती आता दिसून येत आहे, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. पिंपरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मनसे नेते राजेंद्र ऊर्फ बाबू वागसकर, मनसे शहाराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापूरकर, सचिव रूपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, विशाल मानकरी आदी उपस्थित होते. मेळाव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी व नवीन पदांची निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, असेही नांदगावकर यांनी सांगितले.
लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी उद्योग
नांदगावकर म्हणाले, “अबू आझमी नेहमी चुकीची वक्तव्ये करून लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. मीच मुसलमानांचा तारणहार आहे, असे भासवण्यासाठी ते अशी वक्तव्ये करतात. अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मागणी योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भविष्यात कोणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत, यासाठी राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी कडक कायदेशीर कारवाई करावी.”