Baramati Nagar Parishad: 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:49 IST2026-02-17T19:48:29+5:302026-02-17T19:49:26+5:30
हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे

Baramati Nagar Parishad: 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला
बारामती : “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी (दि २१) दुपारी १२.०० वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेने नगरपरिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या यशाबाबत नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले कि, माझ्या बारामती शहराची देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये गणना झाली पाहिजे. हे ‘अजितदादां’चे स्वप्न होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे मोठे यश आहे. आज ‘दादां’च्या बारामतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेले यश पाहण्यासाठी तेच आपल्यात नाहीत. याची खुप मोठी खंत बारामतीकरांमध्ये आहे.‘दादां’वर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या बारामतीकरांचे यामध्ये मोठे योगदान आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या नकाशावर बारामतीची ओळख करण्यासाठी आम्ही बारामतीकर सज्ज आाहोत.‘दादां’ना अभिप्रेत असणारे देशातील शहर घडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबध्द आहोत, असे सातव म्हणाले.