बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:41 IST2025-11-09T17:40:22+5:302025-11-09T17:41:24+5:30
राज्यात ९ वर्षांनी २८८ नगरपरीषद आणि पंचायत समिती निवडणुका होत असून बारामतीसह राज्यभर आम्ही लक्ष ठेवून आहोत

बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
बारामती: जय पवार बारामतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चेने शहराच्या राजकीय वर्तुळात जोर धरला होता. मात्र,खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि ९) पत्रकारांशी बोलताना या चर्चेला पुर्णविराम दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी, मी पण ती चर्चा एकली. मला आज पण बरेच जण म्हणाले. परंतु तसं काही होणार नसल्याचे सांगत जय पवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी राज्यातील नगरपरीषद निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सोमवार ते शुक्रवार आम्ही राज्याचा आढावा घेतला. बारामतीत चाचपणी केली. बारामती आघाडीवर लढली जायची हि परंपरा होती. १९९१ ला राजकारणात सक्रिय झाल्यावर ठरवलं की पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. पक्ष चिन्हावर लढले नाही, तर तुम्हाला व्हीप बजावता येत नाही. काही मर्यादा येतात. पक्षविरोधी कृती झाल्यावर कारवाई करता येते. त्यानुसार आजपर्यंत निवडणुका लढविल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. राज्यात ९ वर्षांनी २८८ नगरपरीषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून आहोत. पुढील पाच वर्षात शहराचा कायापालट करायचा आहे. बारामतीत साैरउर्जेवर पथदिवे सुरु करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अजून बरीच कामे बाकी आहेत. बारामतीची जबाबदारी माझी आहे. ज्यांना माझ्या बाजुने अर्ज भरायचे आहेत. त्यांनी बुधवारपर्यंत अर्ज भरु नका, गुरुवारी सकाळी सातपासून मी स्वत: नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. इच्छुक उमेदवारांचे सामाजिक प्रश्नांची जाण, आजपर्यंतचे सामाजिक काम आणि जनसामान्यातील त्यांचे स्थान लक्षात घेवूनच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निवडले जातील. मुलाखतीनंतर मेळावा घेणार आहे. तसेच दुपारी माळेगाव नगरपंचायतीसाठी मुलाखती आणि मेळावा होणार असल्याचे पवार म्हणाले.
निवडणुकीच्या लढतीबाबत महायुतीचे नेते चर्चा करणार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या लढतीबाबत महायुतीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि वरीष्ठ पदाधिकारी यांची बैठक हिऊन चर्चा होईल. सर्वांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे असे मत आहे. जो तो पक्ष ताकद असणाऱ्या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करतो. पक्षाची ताकद असणाऱ्या ठिकाणी मित्रपक्षांना सन्मानपुर्वक जागा दिल्यास फारसा प्रश्न उरत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली जागा ताकद आजमावण्याचा अधिकार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.