Ajit Pawar Passed Away: प्रजासत्ताकदिनी मानवंदना! अजित पवार यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम पुण्याचाच ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:25 IST2026-01-29T15:23:00+5:302026-01-29T15:25:35+5:30
Ajit Pawar Passed Away समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले होते

Ajit Pawar Passed Away: प्रजासत्ताकदिनी मानवंदना! अजित पवार यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम पुण्याचाच ठरला
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम पुण्याचाच ठरला. पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताकदिनी मानवंदना स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांनी विमान अपघातात बारामतीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मूळ पुणे जिल्ह्याचे असलेल्या अजित पवार यांचा अपघाती मृत्यू बारामतीच्या मातीतच होणे, यासारखा दुर्दैव विलास दुसरा नाही, अशी हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.
पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी कारकीर्द संस्मरणीय ठरली. केवळ एका वर्षाचा अपवाद वगळता, २००४ पासून तब्बल १६ वर्षे ते पुण्याचे पालकमंत्री होते. पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मान मिळतो. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी अर्थात निधनाच्या दोन दिवस आधी मानवंदना घेताना त्यांचा हा शेवटचा सरकारी कार्यक्रम ठरला. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वांत मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले होते.
अजित पवार यांनी पहिल्यांदा २००४ मध्ये पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत पालकमंत्री म्हणून सलग काम केले. त्यानंतर पाच वर्षांच्या खंडानंतर २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा पालकमंत्रिपद स्वीकारले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते २०१९ ते २०२२ व महायुतीच्या सरकारमध्ये २०२३ ते २०२६ या काळात पुण्याचे पालकमंत्री होते.