मुंबई-पुणे हायवेवरील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे; महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:26 IST2026-02-06T15:26:22+5:302026-02-06T15:26:37+5:30
टँकरमधून बाहेर पडणारा गॅस ज्वलनशील होता, त्यामुळे प्रशासनाला तिथे काही करता येत नव्हते - जिल्हाधिकारी

मुंबई-पुणे हायवेवरील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे; महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी प्रोपेलीन गॅस घेऊन जाणारा टँकरचा अपघात झाला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा येथे थांबविण्यात आली होती. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या अपघातात तज्ज्ञांच्या पथकाशिवाय काहीच करता येत नव्हते. या घटनेचा अहवाल तयार करून चौकशी केली जाईल. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल, पर्यायी व्यवस्थाही उभी केली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
द्रुतगती महामार्गावर अपघात होतात, मात्र अपघाताच्या घटनेनंतर अर्ध्या तासात मदत पोहोचते. मात्र गॅस टँकरच्या अपघाताची घटना वेगळी होती. टँकरमधून बाहेर पडणारा गॅस ज्वलनशील होता, त्यामुळे प्रशासनाला तिथे काही करता येत नव्हते. त्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाची आवश्यकता होती. हे पथक आल्यानंतर अतिशय काळजीपूर्वक हे काम करण्यात आले. मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेचा सविस्तर अहवालही आम्ही तयार करून त्याची चौकशी करत आहोत असे जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणार
दक्षिण भारतातून येणाऱ्या वाहनचालकांना त्याविषयी काही जागृती करता येईल का? त्याचबरोबर, अशा घटना घडल्यानंतर महामार्गावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पर्यायी रस्ते कसे उपलब्ध करून देता येतील, याचा विचार जिल्हा प्रशासन करत आहे, असे जितेंद्र डुडी यांनी सांगितले.