मुंबई – सदानंद दाते यांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. पिक्चरमधला डायलॉग असतो ना, "सिर्फ नाम ही काफी है।" तसं दाते साहेबांबद्दल बोलता येईल. एक कर्तव्यनिष्ठ, स्वच्छ आणि कर्तव्यकठोर अधिकारी आपल्याला ह्या पोलिस आयुक्तालयाला पाहिला आयुक्त म्हणून लाभला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आणि अभिमान आहे की आपलं सरकार आल्यानंतर आपण मिरा-भाईंदर, वसई-विरार यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे लोकार्पण केले. हे नवीन आयुक्तालय म्हटल्यानंतर अजूनही काही गोष्टी पूर्ण झालेल्या नाही आहेत, पूर्णत्वाची गरज आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की अजिबात काळजी करू नका, हे सरकार तुमच्यासोबत, तुमच्या पाठी प्रत्येक पावलावर खंबीरपणे उभे आहे, मजबुतीने उभे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच भले राज्य सरकारने नियमावली जाहीर केली की जिथे शक्य असेल तिथे "वर्क फ्रॉम होम" करा, पोलिस करू शकतात? मी करतोय तर माझ्यावर टीका होतेय. ठीक आहे, प्रत्येकाची कामाची एक पद्धत असते आणि काम होण्याला महत्त्व आहे परंतु पोलिस मात्र "वर्क फ्रॉम होम" करू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मला म्हणायचे, दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत, ही दहशत मोडून काढा. जर गुंडागर्दी चालू असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे, त्या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महिला अत्याचार सहन होणार नाही
उत्तर प्रदेशमध्ये जे घडले, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार! केवळ मिरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मिरा-भाईंदरमध्ये पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोलिसांना सांगितले आहे.
त्याचसोबत हे पोलीस आयुक्तालय मिरा-भाईंदर आणि वसई-विरारचे असले तरी आजूबाजूच्या परिसरात गुंडागर्दी करणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आयुक्तालय आहे. आम्ही विश्वासाने फार मोठी जबाबदारी दाते साहेब आपल्यावर सोपविली आहे. आम्ही सगळे जण तुमच्यासोबत आहोत. कुठेही काहीही आम्ही कमी पडू देणार नाही हे वचन मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्याला देतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. मिरा-भाईंदरचे नाव चांगल्या पद्धतीने केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात घेतले जावे असा कारभार करावा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सदानंद दाते यांना दिल्या.